Sanjay Raut : "...म्हणून मी भाजपचे आभार मानतो"; संजय राऊत पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On Narendra Modi : संविधान बदलण्याचा आरोप असणारे मोदी संविधानापुढे नतमस्तक झाले, या प्रश्नाचं उत्तर देताना पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले, मोदी नाटक आणि ढोंग करतात. संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना लोकांनी नाकारलं आहे. त्यामुळे त्यांना संविधानाची प्रत मस्तकी लावण्यासाठी सूचलं. त्यासाठी मी भाजपचे आभार मानतो. हे सरकार टीकणार नाही. मी हे निकाल लागल्यापासून म्हणत आहे. हे नरेंद्र मोदींनाही माहित आहे. अमित शहांनाही माहित आहे. त्यांचा चेहराच सांगतोय. जो पर्यंत सरकार आहे, तोपर्यंत शेअर बाजार आपल्या ताब्यात ठेवायचा. आपल्यासोबत असलेल्या उद्योगपतींचा फायदा करून घ्यायचा. देशाच्या लाखो, कोट्यावधीं रुपयांना चूना लावायचा. हे आमचं धोरण दिसत आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
राऊत पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले, मोदींचा तिसरा टप्पा हा कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी आहे. सरकार बनवण्यासाठी त्यांना जे मदत करत आहेत, त्यांच्यासाठी हा टप्पा आहे. हे आता स्पष्ट झालं आहे. शेअर बाजार म्हणजे जनतेचे प्रश्न सुटले असे नाही. नरेंद्र मोदी अजूनही बेरोजगारी, महागाई, चीनची घुसखोरी अशा अनेक प्रश्नांवर बोलले नाहीत. ते अजूनही शेअर बाजारावर बोलत आहेत. हे तिसऱ्यांदा सरकार जे येत आहे, ते कॉर्पोरेट, व्यापारी, उद्योगपती यांच्यासाठी आहे. हे सर्व लाभार्थी एकत्र येऊन सरकार बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सरकार टीकणार नाही.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अभूतपूर्व यश मिळालं. ३० जागांचं यश मोठं यश आहे. पैशाची दहशत, जबरदस्ती, प्रशासनावर दबाव टाकून त्यांच्या ८- १० जागा मिळाल्या. अमोल किर्तीकरांचं उदाहरण समोर आहे. नाहीतर महायुतीला १० जागाही मिळाल्या नसत्या. विधानसभेला याचा वचपा काढला जाईल. हे आता यांना कळून आलं आहे, आपण पुन्हा निवडून येत नाहीत. जे पळून गेले आहेत, त्यांच्या मनात चलबीचल सुरु आहे. त्यांच्या मनात तरंग उठत आहेत. त्याचं काय करायचं बघू, असंही राऊत म्हणाले.