'मतदानाच्या दिवशी ईव्हीएम बंद पडणं हे भाजपचं कटकारस्थान' संजय राऊत यांची टीका

'मतदानाच्या दिवशी ईव्हीएम बंद पडणं हे भाजपचं कटकारस्थान' संजय राऊत यांची टीका

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज (ता.२६) मतदान होत आहे. महाराष्ट्रासह देशातील १२ राज्यांतील ८८ लोकसभा मतदारसंघांत मतदान पार पडत आहे.
Published by :
shweta walge

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज (ता.२६) मतदान होत आहे. महाराष्ट्रासह देशातील १२ राज्यांतील ८८ लोकसभा मतदारसंघांत मतदान पार पडत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात मतदान होत आहेत. यातच राज्यात अनेक ठिकाणी मतदानयंत्रात बिघाड झाल्याच्या बातम्या येत आहेत. वर्धा व अमरावती इथं ईव्हीएम बिघाडाचा मतदारांना फटका बसला. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

ते म्हणाले की, ‘ईव्हीएम बिघाड वारंवार होतोय की केला जातोय हे पाहायला हवं. वर्धा, अमरावतीमध्ये महाविकास आघाडी जिंकते आहे. वर्ध्यात भाजपच्या पायाखालची वाळू घसरली आहे. या भीतीपोटी कोणतंही अघोरी कृत्य होऊ शकतं. ईव्हीएम मशीन बंद पडणं आणि मतदारांना ताटकळायला लावणं, मग मतदारांनी मतदानाकडं पाठ फिरवणं हा कटकारस्थानाचा भाग असतो, असं राऊत म्हणाले.

'साधारण संध्याकाळच्या वेळी ईव्हीएम मशीन सुरू करायच्या, मग हव्या त्या झुंडी येऊन उभ्या करायच्या, पण सकाळी येणाऱ्या मतदारांना नाउमेद करणं, निराश करणं हे मोदीकृत भाजपचं षडयंत्र आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

पुढे ते म्हणाले की, ‘महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणुका जिंकतील असं वातावरण आहे. ३० ते ३५ हा आमचा आकडा आहे. आज मतदान होत असलेल्या आठही जागा महाविकास आघाडी जिंकत आहे,’ असा दावा संजय राऊत यांनी आज केला.

दरम्यान, अमरावती, अकोला, नांदेड आणि वर्ध्यात ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या. ईव्हीएममध्ये बिघाड होताच निवडणूक अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com