नाशिक पदवीधर बिनविरोध होणार नाही, संजय राऊत यांचं मोठं विधान
नाशिकमध्ये काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज न भरल्याने काँग्रेसचीच कोंडी झाली. येथील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीची घोषणा गुरुवारी सकाळी दिल्लीतून करण्यात आली, मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत डॉ. तांबे यांनी अर्ज सादर केला नाही. त्यांच्याऐवजी त्यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीचं राज्यात सरकार होतं. कॉमन मिनिमम प्रोग्रामवर हे सरकार आम्ही चालवलं. त्यात उत्तम समन्वय होता. ज्या पद्धतीने सरकार चालवलं तोच समन्वय तोच एकोपा हा विरोधी पक्षात असतानाही असायला हवा. तरच आपण पुढील लढाया जिंकू शकतो.तांबेंनी काय निर्णय घेतला हे त्यांच्या नेतृत्वाला माहीत नसेल तर त्याला काय करणार? राहुल गांधी तांबे यांच्या घरी राहिले होते. अशा कुटुंबावर अविश्वास कसा दाखवणार? त्यांच्या डोक्यात काय चाललंय? भाजपने काय गुप्तपणे कारवाया केल्या? असे राऊत म्हणाले.
यासोबतच सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यासाठी काँग्रेसला दोष देण्यात अर्थ नाही. पण नाशिक पदवीधरची निवडणूक बिनविरोध होणार नाही. आम्ही मातोश्रीवर भेटणार आहोत. त्यात निर्णय घेऊ.हे प्रत्येकवेळी समजतं असं नाही. त्यामुळे काँग्रेसला दोष देणार नाही. आम्हीही अशा प्रकाराला सामोरे गेलो आहोत. पण भविष्यात समन्वय ठेवला तर असे प्रसंग होणार नाही,पाच जागांसाठी एकत्र बसून चर्चा व्हायला हवी होती. पण ते झाल्याचं दिसत नाही. मी कुणाला दोष देत नाही. नागपूर, अमरावतीबाबत काळजीपूर्वक निर्णय घ्यायला हवा होता. अमरावतीत काँग्रेसकडे उमेदवार नव्हता. त्यांनी आमचा उमेदवार घेतला. असे देखिल राऊत म्हणाले.