Sanjay Raut : मोदी हे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत, त्यांना आता कोणत्याही घोषणा करण्याचा अधिकार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरुन संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी हे देशाचं प्रधानमंत्री होते आता नाहीत. आता फार तर ते निवडणुकीची घोषणा झाल्यावर निवडणुकीत जेव्हा घोषणा होते राज्यात किंवा देशात तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री फार तर कार्यवाहक मुख्यमंत्री असतात आणि देशाचं प्रधानमंत्री हे कार्यवाहक प्रधानमंत्री असतात. त्यामुळे त्यांना सरकारी यंत्रणेचा वापर करुन प्रचाराला जाता येत नाही आणि जर ते तसे गेले तर निवडणूक आयोगाने त्यासंदर्भातल्या खर्चाचं बिल त्यांना पाठवायला हवं. त्या पक्षाच्या खात्यातून किंवा त्या पक्षाकडून ते पैसे वसूल केले पाहिजे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून निवडणूका जाहीर झाल्यापासून सरकारी यंत्रणा, सरकारी विमानं घेऊन फिरत आहेत. घोषणा करत आहेत. त्यांचा एक एक दौरा हा 25 -25 कोटींचा असतो. काय आचारसंहिता फक्त विरोधी पक्षासाठी आहे? काँग्रेससाठी, शिवसेनेसाठी, राष्ट्रवादी काँग्रेससाठी आहे. नोटीसा फक्त आम्हालाच येणार. प्रधानमंत्री ज्या पद्धतीने सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत आहेत आणि प्रचाराला उतरले आहेत सरकारी यंत्रणा घेऊन हा भ्रष्टाचार नाही. मोदी हे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत. त्यांना आता कोणत्याही घोषणा करण्याचा अधिकार नाही. त्यांना सरकारी यंत्रणा वापरण्याचा अधिकार नाही. हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे.
आपण म्हणता ते मुंबईला येत आहेत. काय शोधायला येत आहेत. जमिनी शोधायला येत आहेत? अदानीला कोणती जमिन द्यायची आहे कोणती शिल्लक आहे का? ते वरुन पाहणार आहेत का? गेल्या काही वर्षात भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांनी मुंबई विकली गौतम अदानी या त्यांचा उद्योगपती मित्राला, धारावी विकली, मुंबईचे भूखंड विकलं. मुंबईचं उद्योग पळवलं. आता मोदी दहा सभा घेऊन काय करणार आहेत. अजून त्यांना काय विकायचं आहे. पण एक लक्षात घ्या मुंबईने दहा नाही शंभर सभा घेऊ द्या मुंबईच्या जनतेनं ठरवलं आहे की मुंबईतून भाजपा पूर्ण तडीपार करायचं. देशातून होतेच आहे पण मुंबईत दहा सभा घेतल्या तरी त्यांना एकही जागा मिळणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. असे संजय राऊत म्हणाले.