Sanjay Raut : "मराठीला सगळ्यात जास्त धोका कोणापासून असेल तर तो गुजराती भाषेपासून"
पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, "हे सगळं ठरवून चाललं आहे. महानगरपालिका निवडणुकीच्याआधी कोणता वाद निर्माण करता येईल याच्यावरती कॅफेमध्ये खल झालं. मराठीच पाहिजे ना या मुंबईमध्ये त्याच्याविषयी काही आक्षेप असण्याचे कारणच नाही आहे."
"महाराष्ट्राला आणि मराठीला सगळ्यात जास्त धोका कोणापासून असेल तर तो गुजराती भाषेपासून आहे. ज्यांनी संपूर्ण पश्चिम मुंबईचे गुजरातीकरण करण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यावरती का कुणी बोलत नाही? भाजपला वाईट वाटेल म्हणून. त्याच्यावरती कॅफेत चर्चा होतेय का? हिंदीच्या सक्तीविरुद्ध आमचा वाद आहे. हिंदी भाषेला वाद असण्याचे कारण नाही. हे शैक्षणिक धोरणाच्या भागापुरतंच मर्यादित आहे पण महापालिका निवडणुकीच्याआधी त्यांना हे नवीन वाद निर्माण करायचे आहेत."
"घाटकोपरची, बोरीवलीची भाषा गुजराती याच्यावरती हे का उसळत नाहीत. एक संपर्क भाषा म्हणून हिंदी भाषा आहे. त्रिसूत्री भाषा हा जो आहे प्रकार हा विषय तिसऱ्या भाषेसंदर्भातला आहे. ज्याला घ्यायची आहेत ते घेतील पण सक्ती करायची नाही, मिस्टर फडणवीस. हा महाराष्ट्र आहे. आम्ही बोलतोय ना हिंदी. आम्ही दिल्लीत देशात जाऊन हिंदीच बोलतोय.
"राज ठाकरे अमित शाहांशी कोणत्या भाषेत बोलतात, राज ठाकरे मोदींशी कोणत्या भाषेत बोलतात. तुम्हाला संपर्क भाषा म्हणून हिंदीतच संपर्क करावा लागतो. ज्यांचे इंग्रजींचे वांदे आहेत त्यांना हिंदीचा आधार घ्यावाच लागतो ना. कशाला नाटक करताय?" या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात आणि देशात फिरताना आम्हाला हिंदीचा आधार घ्यावा लागतो. मराठीवरती आम्ही आक्रमण होऊ देणार नाही ही आमची भूमिका कायम आहे. मराठी आई आहे, इतर भाषा आमच्या मावश्या आहेत." असे संजय राऊत म्हणाले.