Sanjay Raut : 'राज ठाकरेंची भूमिका नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही'; संजय राऊत स्पष्टच बोलले

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी मागणी सगळीकडे जोर धरू लागली आहे.
Published by :
Rashmi Mane

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी मागणी सगळीकडे जोर धरू लागली आहे. यातच आता अभिनेते महेश मांजरेकर यांनी 'वास्तव में Truth' या कार्यक्रमात राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांना "समजा शिवसेना फुटली, नाही फुटली तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. यावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. विविध पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो, असे म्हटले आहे.

काय म्हणाले संजय राऊत

"राज आणि उद्धव ठाकरे हे दोघे भाऊ आहेत. तेही ठाकरे आहेत, हेही ठाकरे आहेत. हे नातं आहे. ते कायम राहिल. राज ठाकरे यांचे वक्तव्य मी पण ऐकलंय. जी भूमिका मांडली ती महाराष्ट्रच्या हितासाठीची आहे. उद्धव ठाकरे यांचा मार्ग कायम महाराष्ट्र हिताचा राहिला आहे. फक्त भूमिका एवढीच आहे की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, महाराष्ट्राच्या मूळावर येणारा जो आहे, त्याच्यासोबत जाऊ नये. छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू महाराष्ट्राचे शत्रू ही भूमिका तुम्ही घेत असाल तर स्वागत आहे", असे राऊत म्हणाले.

पुढे राऊत यांनी नमूद केले की, "सध्या महाराष्ट्राची गंभीर परिस्थिती आहे. आम्ही आमच्या घरामध्ये किंवा दारामध्ये महाराष्ट्र दोषींना कधीही थारा देणार नाही. अशी भूमिका राज ठाकरे किंवा त्यांच्या माणसाने करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्तित्व मिटवण्याच्या मागे ते आहेत. त्यांना ठाकरे हे नावच मिटवायचं आहे. दोन्ही ठाकरेंनी साद आणि प्रतिसाद अशी भूमिका घेतली असेल तर स्वागत आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी जर तुम्ही एकत्र येत असाल, तर तुम्हाला नाकारण्याचा करंटेपणा आमच्यापासून होणार नाही. राज ठाकरे यांनी मनमोकळ केल आहे. त्यावर उद्धव ठाकरेसुद्धा बोलले आहेत. थोडं थांबा आपण वाट पाहू."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com