Sanjay Shirsat- " एकनाथ शिंदे आमचे एकच टायगर" संजय शिरसाटांचा अप्रत्यक्ष टोला
आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज एका पत्रकार परिषदेत महत्त्वाचे राजकीय संकेत दिले. त्यांनी स्पष्ट केलं की "ऑपरेशन टायगर" लवकरच सुरू होणार असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत आणि लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
शिरसाट म्हणाले की, "मुंबई महानगरपालिकेतील ४० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी आमच्या गटात प्रवेश केला आहे आणि येत्या सोमवारपासून असंख्य कार्यकर्ते आमच्या पक्षात सामील होणार आहेत."
पत्रकारांनी विचारले की, “ऑपरेशन टायगरमधील 'टायगर' कोण?” यावर शिरसाट यांनी उत्तर देत म्हणाले की, "आमचे एकच टायगर – एकनाथ शिंदे साहेब." तसेच, सामनाच्या संपादकांवर टीका करत ते म्हणाले, "गेल्या दोन-अडीच वर्षात सामनातील एकही भाकित खरे ठरले नाही. त्यांच्या अशुभ बोलण्याने आमच्या पक्षावर काही परिणाम होत नाही."
मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात त्यांनी स्पष्ट केले की, "मुंबई ही शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या ताब्यातच राहील, भगवा फडकणार हे निश्चित आहे."
राजकीय समीकरणांबाबत मत
"राज आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं अशक्य आहे. त्यांनी समाजवादी पक्ष आणि एमआयएमसोबत जवळीक साधण्याचे प्रयत्न केले आहेत," असंही ते म्हणाले. दोन्ही ठाकरे बंधूंनी मुंबईचा वाटोळा केलं का, या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केलं की, "राज ठाकरे यांचा काहीही संबंध नाही. उलट त्यांनी अनेकदा मुंबईसाठी ब्लूप्रिंट सादर केली आहे, मात्र भ्रष्टाचार करणाऱ्यांनीच मुंबईची वाट लावली असा उपोरोधीक टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
इतर महत्त्वाचे मुद्दे:
•वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाणला गृहराज्यमंत्री यांनी परवानगी दिल्याबद्दल माहिती नसल्याचे सांगून त्यांनी बोलणं टाळलं.
•तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावर ते म्हणाले, "कायद्यानुसारच कारवाई होईल, कोणालाही लगेच फाशी देता येणार नाही."
* आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय बैठका सर्व पक्षांच्या होत आहेत, यात नवल नाही.
* अंबादास दानवे यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनाच्या मुद्द्यावर ते म्हणाले, "प्रॉपर्टी कोणाची आणि बोलतो कोण? त्यामुळे यावर बोलण्यात अर्थ नाही." दानवेंचे दिवाळे लवकरच बाहेर निघेल असा सूचक इशारा त्यांनी दिला.
"क्या हुआ तेरा वादा?" आंदोलनावर त्यांनी उपहासाने प्रतिक्रिया दिली की, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला "आता फक्त टाळ्या वाजवणे आणि गाणी म्हणणे ही कामे उरली आहेत."
शेवटी त्यांनी ठामपणे म्हटले, "एकनाथ शिंदे आमचे डॉक्टर आहेत. संजय राऊत यांच्या गळ्यातला पट्टा त्यांनीच काढला आणि जनतेत आणलं. त्यांच्या हातातच सगळ्या अडचणींचे उपाय आहेत.