Pahalgam Attack : 'आतातरी औरंगजेबाची कबर हटवा'; शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती महाराज यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
"ज्याच्याशी लढताना छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलं, त्या औरंगजेबाची कबर आजही महाराष्ट्रात आहे, ही खेदजनक गोष्ट असून ती तात्काळ हटवावी," अशी जोरदार मागणी शारदा आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती महाराज यांनी केली आहे. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर निर्णय घ्यावा, अन्यथा सनातन हिंदू धर्मियांना स्वतः पुढाकार घ्यावा लागेल," असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पहलगाममध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. "हा हल्ला केवळ व्यक्तींवर नव्हे, तर संपूर्ण हिंदू धर्मावर आहे," असं मत त्यांनी व्यक्त केलं.
शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं. मात्र आजही त्याच औरंगजेबाच्या कबरीला जपणं, हे दुर्दैव आहे. यामुळे आता तरी सरकारने ती काढून टाकावी."
त्याचबरोबर, पहलगाममधील हल्ल्याचे समर्थन करणाऱ्या आणि 'धर्म विचारून हत्या केली गेली नाही' असं सांगणाऱ्या नेत्यांवरही त्यांनी टीका केली. "गेल्या सत्तर वर्षात अशाच नेत्यांमुळे देशात दहशतवाद पोसला गेला," असा थेट आरोप त्यांनी शरद पवार आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर केला.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचंही समर्थन
या मुद्द्यावर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, "प्रत्येक हिंदूने स्वतःच्या सुरक्षेसाठी सजग असलं पाहिजे. गरज पडल्यास शस्त्र बाळगण्याचाही विचार करावा. हे हल्ले आत्मरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतात."