Sharad Pawar-Ajit Pawar : काका-पुतण्या एकाच मंचावर, मात्र दोघांत बरंच अंतर; दुरावा वाढणार की कमी होणार ?
सातारा, शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६६ व्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्याच्या कर्मवीर समाधी परिसरात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (शरद पवार गट) शरद पवार यांनी भाषणात रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच बदलत्या काळातील आव्हानांवर स्पष्ट भूमिका मांडली. या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे या कार्यक्रमात एकाच मंचावर एकत्र दिसले.
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी दोन्ही गट एकत्र येऊ शकतात, असे संकेत दिले होते. त्यांनतर ठाकरे कुटुंबियांप्रमाणेच पवार कुटुंबही एकत्र येतील, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. दरम्यान, एका कार्यक्रमात उपस्थित असून देखील दोघं एकमेकांपासून इतक्या अंतरांवर आहेत, की त्यांच्यात संवादही होऊ नये. त्यामुले पवार कुटुंबातील दुरावा वाढणार की कमी होणार, हा आता कळीचा मुद्दा उपस्थित होत आहे.
मनोगत व्यक्त करताना शरद पवार म्हणाले की, "कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षणाच्या माध्यमातून सामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवले. आज रयत शिक्षण संस्था ही 742 शाखा, सुमारे चार लाख अठरा हजार विद्यार्थी आणि अकरा हजार सहाशे सेवकांचे महाकुटुंब बनले आहे. या कार्याचा केंद्रबिंदू म्हणजे 'शिक्षक' असून शिक्षकांची विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी हेच गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे खरे कारण आहे."
"रयत संस्थेच्या मासिक प्रकाशनाची घोषणा करताना पवार यांनी विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या आणि गुणवत्तावाढ ही दोन महत्त्वाची आव्हाने असल्याचे नमूद केले. संस्थेच्या वाढीबरोबर या बाबीकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
भाषणाच्या शेवटी त्यांनी देशाच्या संरक्षण विषयावर भाष्य करताना भारताचे शांतताप्रिय धोरण अधोरेखित केले. मात्र जर हल्ला झाला, तर उत्तर देण्याची पूर्ण तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांना लष्करात संधी मिळावी, यासाठी संरक्षणमंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयाचा त्यांनी उल्लेख केला. आज महिलाही संरक्षण विश्लेषण क्षेत्रात पुढे येत असल्याचा अभिमान व्यक्त केला.
कर्मवीर भाऊराव पाटलांनी जात, धर्म, भाषा न पाहता ज्ञानासाठी भुकेल्या विद्यार्थ्यांना संधी दिली, ही शिकवण आजही तितकीच प्रासंगिक आहे, असे सांगून पवार यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले. कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.