शरद पवार आणि त्यांच्या सोबतीच्या सर्वांनी पुनर्विचार करावा - छगन भुजबळ
आमच्या जुन्या मित्रांनी आणि नेत्यांनी पुनर्विचार करायला हवं. पुनर्विचार केला नाही तर किमान थांबायला हवं. तुमच्या पुढं काय ठेवलंय ते पहा. मी पण पक्षाच्या जन्मापासून होतो. मात्र आता महिला, पुरुष आणि तरुणांचे जे संघटन अजित दादांच्या माध्यमातून उभारलं आहे. ते पहा आणि पुनर्विचार करा. अस आवाहन छगन भुजबळ यांनी शरद पवार आणि त्यांच्या सोबतीच्या सर्वांना केला आहे. ते राष्ट्रवादीच्या पुण्यातील मेळ्यात बोलत होते.
काय म्हणाले छगन भुजबळ?
कोण म्हणतं पक्ष चोरलं, कोणी आणखी काही म्हणतं. मात्र लक्षात ठेवा लोकशाही आहे. ज्या बाजूने बहुमत आहे, त्यांच्याबाजूने निर्णय लागतो. म्हणूनच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह ही मिळालं. आता हे जे आपल्याला चिन्ह मिळालं, त्याचा सगळा वाटा माझा आहे. कारण हे चिन्ह मिळविण्यात मी ही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यात सिंहाचा वाटा आमचा होता. त्यामुळं आता वाईट वाटून घ्यायचं कारण नाही.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. यात जीव तोडून काम करावं लागेल. आपल्या कामाचा हिशोब केला जाईल. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत याचा विचार केला जाईल. एकमेकांचे पाय खेचणे बंद करा. खेकड्याच्या वृत्तीने काम करू नका. संकटं खूप येणार, अडचणी येणार. काळजी करू नका. हारी हुई, बाजी हम पलट कर रहेगे. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाचे वादळ उठलेले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भूमिका आपली पहिल्यापासून आहे. 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान आपण मराठा आरक्षण संदर्भात नवा कायदा येतोय. त्याला आपला खंबीर पाठिंबा आहे. लहान-सहान सर्वांना सोबत घेऊन पुढं जावं लागेल. अजित दादांना मुख्यमंत्री करण्याचं आपलं स्वप्न आहे. यासाठी अल्पसंख्याक ही सोबत घेऊन जावं लागेल. कोणावर ही अन्याय होता कामा नये. जीभ घसरली तर अवघड होतं. शांततेत काम करावं लागणार आहे. अजित दादांच्या नेतृत्वात आपल्याला एक नंबर राहायचं आहे.