"साहेब आजारी पडतात, साहेबांनी घरी थांबावं", उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शरद पवारांना सल्ला
Ajit Pawar On Sharad Pawar : आमचं काम व्यवस्थित सुरु आहे. पण विरोधक आमच्या नावाने मुद्दाम बोटं मोडत आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे, अजिबात भावनिक होऊ नका. भावनिक होऊन बारा गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी निधी आणावा लागेल. आढळरावांना सोबत घेऊन निधी आणावा लागेल. केंद्राचा निधी आणि राज्याचा निधी त्यातून आपली कामे होणार आहेत. साहेब (शरद पवार) आजारी आहेत, साहेबांनी घरी थांबावं. काल म्हणाले, त्यांनी काढलेला पक्ष काँग्रेससोबत विलीन करायचा आहे. काँग्रेसचं आणि तुमचं जमलं नाही, म्हणून तुम्ही काँग्रेसमधून बाहेर पडलात. आता तुम्हाला काँग्रेस चांगली का वाटत आहे? असा थेट सवाल अजित पवारांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवारांना विचारला आहे. ते शिरुरमध्ये शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
जनतेला संबोधीत करताना अजित पवार म्हणाले,आम्ही सरकारमध्ये असताना भाजपचे किंवा इतर विरोधी पक्षाचे आमदार माझ्याकडे आल्यावर त्यांचं काम मी करायचो. कारण तेही पाच-पाच लाख लोकांच्यातून निवडून येत असतात. काही झुकतं माप सत्ताधारी पक्षाला मिळत असेल, त्याबद्दल दुमत नाही. परंतु, विरोधकांची कामे अजिबातच केली नाही, तर कसं चालेल. असं राजकारण आणि समाजकारण होत नाही. भावनिक होऊन मतदान करु नका. ही देशाची निवडणूक आहे. आपल्याला केंद्राचा निधी आणायचा आहे. गिरीष बापट यांनी पुण्यात निधी आणला. नदी-सुधार कार्यक्रमासाठी कोटी रुपये आणले.
पिण्याच्या पाण्यासाठी २४०० कोटी रुपयांची योजना आणली. पुणे एअरपोर्टच्या टर्मिनलसाठी ५०० कोटी रुपये आणले. मेट्रोसाठी १६ हजार कोटी रुपये आणले. आपल्या खासदारांनी काय केलं? खासदार म्हणायेच मला खासदारकी नको, मी राजीनामा देतो. मी अभिनेता आहे. मी चित्रपटात काम करतो. मला वेळ नसतो. मुंबईला शुटिंगसाठी जावं लागतं. मग इकडे पाच वर्षात कितीवेळा आले, निधी दिला की नाही? असा सवाल उपस्थित करत अजित पवारांनी अमोल कोल्हे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली.
मी त्यांना (अमोल कोल्हे) म्हणाले, राजीनामा देऊ नका. आता राजीनामा दिल्यावर लोक आम्हाला मत देणार नाहीत. आता हा पुन्हा उभा राहायला निघाला आहे. त्यांच्याकडून काम होणार नाही. बारामतीत सुप्रिया सुळेंना मी तीनवेळा निवडून दिलं. तरीही विरोधी पक्षाचा खासदार म्हणून विकास होऊ शकला नाही. आपल्याला विकास करायचा आहे. मी राज्य सरकारचा निधी देईलच. त्याबद्दल काळजी करु नका.
दिलीप वळसे पाटील यांनाही सरकारमध्ये आल्यावर कोट्यावधी रुपये दिले. सर्वांना निधी दिला. कारण लोकांची कामं करण्यासाठी आम्ही निवडून येतो. आम्ही फक्त भाषणं करत नाही. लोकांचे प्रश्न सोडवावे लागतात. लोकांच्या अडचणी सोडवाव्या लागतात. दहा वर्ष सर्व लोकांना व्यवस्थित वागणूक दिली ना, ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिलं. महिलांना उज्ज्वला योजनेचा लाभ मिळाला. आम्ही आशा सेविका आणि पोलीस पाटलांचं मानधन वाढवलं, असंही अजित पवार म्हणाले.