Sharad Pawar : सरकारी यंत्रणांचे राजशिष्टाचार पूर्ण करण्याकडे लक्ष, शरद पवारांचा हल्लाबोल
थोडक्यात
राज्यात महावृष्टीमुळे थैमान माजले
अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची घरे उध्वस्त
सरकारी यंत्रणांचे राजशिष्टाचार पूर्ण करण्याकडे लक्ष
राज्यात महावृष्टीमुळे थैमान माजले आहे. राज्यात अनेक ठिकाणी मराठवाड्यासह मुसळधार पावसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची घरे उध्वस्त झाले आहे, पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच, पिकांचे नुकसान झाल्याने काही जणांनी आत्महत्या केल्याचेही समोर आले. अशामध्ये मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री गेल्या काही दिवसांमध्ये सेच त्या त्या राज्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्यामध्ये जाऊन भेटी दिल्या. पण आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले शरद पवार?
सोशल मीडियावर शरद पवार यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, “महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. फक्त पिकांचेच नुकसान या आपत्तीमध्ये झाले नाहीतर, जनावरेदेखील मोठ्या प्रमाणात दगावली आहेत. या अभूतपूर्व संकटाची व्याप्ती खूप मोठी आहे. अतिवृष्टीने फक्त शेतकरी वर्ग बाधित झाला नसून त्याची मोठी झळ गावातील लहान मोठे व्यावसायिक, कारागीर आणि शेतमजुरांना देखील बसली आहे. एकंदरीत गावांमधील बारा बलुतेदार, मागासवर्गीय समुदायावर देखील हे अरिष्ट कोसळले आहे.” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राजशिष्टाचार पूर्ण करण्याकडे लक्ष
पुढे शरद पवार म्हणाले की, “मोठ्या प्रमाणावर गावपातळीवर इंधनाचा आणि अन्नाचा तुटवडा निर्माण झाला असून सार्वजनिक वितरण व्यवस्था गतिमान करण्याची आवश्यकता आहे. रोगराई पसरण्याची शक्यता असून त्यास आळा घालून आरोग्याच्या सुविधा देखील तातडीने उपलब्ध करणे गरजेचे आहे. विध्यार्थांच्या शिक्षणावर देखील विपरीत परिणाम झाला असून त्याकडे त्वरेने लक्ष द्यावे लागेल.” असा सल्ला दिला आहे. तसेच, “पिडीतांना भेटण्यासाठी मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांची अतोनात गर्दी होत आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणांचे लक्ष, नुकसानीचे पंचनामे आणि आपत्ती निवारणाच्या कामांऐवजी राजशिष्टाचार पूर्ण करण्याकडे वळले आहे. त्यामुळे पंचनामे करण्यास विलंब होऊन मदतकार्य ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे.” अशी चिंता व्यक्त करत त्यांनी टीका केली.
प्रशासनात असताना…
शरद पवार यांनी यावेळी स्वतः प्रशासनात असताना काय केले? त्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, “लातूर भूकंपावेळी पंचनामे आणि मदतकार्यात अडथळा येऊ नये, म्हणून राज्याचा प्रमुख या नात्याने मी लोकप्रतिनिधींचे दौरे थांबवले. एवढेच नव्हे तर इतर नेते तसेच दस्तुरखुद्द पंतप्रधानांनासुद्धा काही दिवस भूकंपग्रस्त भागात दौरा करू नयेत अशी विनंती केली होती.” पुढे ते म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांचा व्याप पाहता पंचनामे वेळेत करुन योग्य मदतकार्य सुरु व्हावे, यासाठी आपत्तीग्रस्त भागात इतर जिल्ह्यांमधून अतिरिक्त मनुष्यबळ तसेच महसूल, कृषी, पाटबंधारे आणि इतर शासकीय अधिकारी यंत्रणा तातडीने पाचारण करणे आवश्यक आहे. मुंबई बॉम्बस्फोट, लातूरचा भुकंप यासारखी अस्मानी-सुलतानी संकटाची परिस्थिती मी राज्याचा प्रमुख असताना जवळून पाहिली आणि हाताळली आहे. अशा भयानक संकटात सापडलेली हजारो घरे आणि कुटूंबे पुन्हा उभी करण्यासाठी शासकीय यंत्रणेचे योगदान मोलाच होते. अशा प्रसंगी शासकीय कर्मचारी स्वतःला झोकून देऊन काम करतात हे महाराष्ट्रातील शासकीय यंत्रणेने अनेकदा सिद्ध केले आहे. फक्त तिच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहण्याची आवश्यकता आहे. या प्रसंगी राज्यसरकार पिडीतांना दिलासा देण्याचे, त्यांना पुन्हा सक्षम करण्याचे काम करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.”