'दहशतवादाविरोधात निर्णायक पावलं उचलणं ही जागतिक जबाबदारी'; शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
"भारताने कधीच दहशतवादाचा पुरस्कार केलेला नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने केवळ दहशतवादी तळांवर प्रखर आणि अचूक कारवाई केली आहे. या कारवाईचा उद्देश कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांवर किंवा सामान्य नागरिकांवर हल्ला करण्याचा नव्हता. ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक आणि अनिवार्य होती," असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज, शनिवारी एका पत्रकार परिषदेत केले.
पवार म्हणाले की, "पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या कुरघोड्यांना संयमाने आणि निर्णायक उत्तर देणं ही भारताची जबाबदारी आहे. भारताने ही जबाबदारी जागतिक शांततेच्या भानासह पार पाडली आहे. भारत हा नेहमीच शांततेचा आणि संवादाचा समर्थक राहिला आहे. त्यामुळे त्यादिशेने काही घडामोडी घडत असतील, तर त्या स्वागतार्ह आहेत."
"मात्र, दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलणं हे केवळ भारताचेच नव्हे, तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाचेही सामूहिक कर्तव्य आहे. शांतीच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल हे दहशतवादाविरोधातल्या सामूहिक लढ्याचं बळ वाढवतं," असेही ते म्हणाले.