Nitesh Rane : 25 वर्षांनंतर महायुतीचा महापौर, नितेश राणे यांचे वक्तव्य

Nitesh Rane : 25 वर्षांनंतर महायुतीचा महापौर, नितेश राणे यांचे वक्तव्य

महापालिका निवडणुका पार पडल्या असून आता त्यांचे निकालही जाहीर झाले आहेत. मुंबई महानगरपालिकेत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

महापालिका निवडणुका पार पडल्या असून आता त्यांचे निकालही जाहीर झाले आहेत. मुंबई महानगरपालिकेत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे. ठाकरे गटाच्या 25 वर्षांच्या मक्तेदारीनंतर अखेर मुंबईत महायुतीचा महापौर बसणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष आता महापौर निवडीकडे लागले आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी या विजयाचे श्रेय मुंबईकरांना देत म्हटले की, “मुंबईकरांनी आम्हाला भरभरून साथ दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने महायुतीला निवडून दिलं आहे.” नितेश राणे यांनी यावेळी महापौर पदाबाबतही स्पष्ट वक्तव्य केलं. “मुंबईचा महापौर हा हिंदूच होईल,” असे सांगत त्यांनी, “जय श्रीराम म्हणत लवकरच महायुतीचा महापौर महापौरच्या खुर्चीवर बसेल,” असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

महायुतीच्या विजयामुळे मुंबईच्या राजकारणात मोठा बदल झाल्याचे मानले जात आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर आता भाजप-शिवसेना महायुतीची सत्ता येणार आहे. प्रचारादरम्यान विकास, पायाभूत सुविधा, सुरक्षेचे मुद्दे आणि ‘डबल इंजिन’ सरकारचा फायदा यावर महायुतीने भर दिला होता. यालाच मुंबईकरांनी प्रतिसाद दिल्याचे बोलले जात आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, महापौर निवड ही केवळ औपचारिक प्रक्रिया नसून, आगामी मुंबईच्या कारभाराची दिशा ठरवणारी ठरणार आहे. त्यामुळे महायुती कोणत्या चेहऱ्यावर विश्वास टाकते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत चर्चांना वेग आला असून, आरक्षण सोडत निघाल्यानंतर महापौरपदाचा चेहरा जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नितेश राणे यांच्या वक्तव्यावर विरोधकांकडून टीका होण्याची शक्यता आहे. मात्र महायुतीच्या नेत्यांचा दावा आहे की, हा विजय विकास आणि विश्वासाचा आहे. येत्या काही दिवसांत महापौर निवडीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असून, मुंबईच्या राजकारणात नवे पर्व सुरू होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com