"...तर कोल्हापूरच्या गादीचा सन्मान झाला असता", छत्रपती शाहू महाराजांबाबत संजय मंडलिकांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून सर्वच राजकीय पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. महाविकास आघाडीकडून कोल्हापूरच्या लोकसभेसाठी छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर राजकीय आखाड्यात त्यांच्या प्रतिस्पर्धी कोण असणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. अशातच आता महायुतीकडून कोल्हापूरच्या जागेसाठी शिंदे गटाचे नेते संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर मंडलिक यांनी छत्रपती शाहू महाराजांबाबत मोठं विधान केलं. ते म्हणाले, त्यांना जर राज्यसभेवर बिनविरोध पाठवलं असतं, तर तो कोल्हापूरच्या गादीचा सन्मानच झाला असता.
संजय मंडलिक पुढे म्हणाले, छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी आम्हाला आदर आहे. परंतु, त्यांना बळी देण्यासाठीच उभं केलं आहे का? अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. काँग्रेसचे शाहू छत्रपती यांच्यावर इतकं प्रेम होतं तर मग त्यांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राज्यसभेवर बिनविरोध का पाठवलं नाही, असा सवालही मंडलिक यांनी उपस्थित केला आहे. केवळ आपल्याला कोणाला उभं राहायचं नाही, म्हणून या वयात शाहू छत्रपती यांना गावोगावी फिरायला लावणं हे दुर्देवी आहे, असंही मंडलिक म्हणाले.