खंडण्या गोळा करायच्या आणि नंतर परदेशात पळ काढायचा; शिंदे गटावर संजय राऊतांनी केला हल्लाबोल
मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. हिवाळी अधिवेशनानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर आता खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू होतो आणि तिथेच संपतो. इतर राज्यांना भूगोल आहे, महाराष्ट्राला इतिहास आहे. शिवाजी महाराज इथे जन्माला आले म्हणून हा इतिहास आहे. महाराष्ट्रानं राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे. त्यावर भाजपानं आपलं मत आधी व्यक्त करावं. सुरुवात करायची आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाच्या विषयापासून करावी लागेल. त्यावरून तुम्ही लक्ष दुसरीकडे वळवू शकत नाही”, असे ते म्हणाले.
यासोबतच “त्यांचा एक गट आहे. टोळी आहे. टोळीला अस्तित्व नसतं. टोळी गँगवॉरमध्ये किंवा पोलीस एनकाऊंटरमध्ये मारली जाते. हे स्वत:ला टोळी मानत असतील तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे. त्यांना एकही जागा नको. जितके दिवस आहेत, तितके दिवस खंडण्या गोळा करायच्या आणि नंतर परदेशात पळ काढायचा असं त्यांचं नियोजन असेल”असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
गुलाबराव पाटीलांनी केलेल्या वक्तव्यावरसुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कारण जे मिंधे असतात, मांडलिक असतात, त्यांना स्वत:चं अस्तित्वच नसतं. ते भाजपामध्ये विलीन झाले आहेत. त्यांना शिवसेनेबरोबर भाजपाची युती करायची होती. पण आता ते आपला पक्ष भाजपात विलीन करत आहेत. त्यामुळे त्यांना एकही जागा नकोय. असे ते म्हणाले.