"मुख्यमंत्री टेकाड आणि 2 उपमुख्यमंत्री टेंगूळ...", संजय राऊत यांची बोचरी टीका
खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे राज्याला आलेले टेंगूळ आहे. असे ते म्हणाले. त्याचबरोबर जातीनिहाय जनगणनेवरुनही निशाणा साधला आहे. दिल्लीपुढे झुकणारा महाराष्ट्र गेल्या तीन वर्षात निर्माण झाला. हिमालय कोण? हिमालय दिल्लीत उरलाय का? महाराष्ट्रात सहयाद्री कोण? एक सीएम आणि दोन डीसीएम हे महाराष्ट्राला आलेलं टेंगुळ आहे. एक टेकाड आहे, दोन टेंगुळं आहेत", अशी बोचरी टीका राऊत यांनी केली आहे.
जातीनिहाय जनगणणेबद्दल काय म्हणाले संजय राऊत ?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की राजकारणात आहेत ना? गेल्या दहा वर्षांपासून राहुल गांधी सातत्याने जातीनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत. त्यांची संसदेमधील भाषणं बघा. त्यांनी कानात बोळे भरले आहेत का? संसदेमध्ये जातीनिहाय जनगणनेला कोणी विरोध केला हे संसदेतील रेकॉर्ड बघितल्यानंतर समजेल. हा एक सामाजिक न्यायाचा विषय आहे. हा निर्णय जरी सरकारने घेतला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. पण या निर्णयाचे संपूर्ण श्रेय राहुल गांधी यांना देतात तेव्हा यांच्या पोटात दुखतं त्याला आम्ही काय करणार? जातीय जनगणनेचा विषय राहुल गांधी यांनी उचलला. तो पर्यंत या देशातील जनतेला माहितही नव्हतं. विरोध भाजपचा होता. कॅबिनेटच्या निर्णयाच स्वागत करतो, राहुल गांधी यांचं अभिनंदन करतो" असं संजय राऊत म्हणाले.
100 दिवसांच्या प्रगतीपुस्तकावरही केलं भाष्य :
मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाच प्रगतीपुस्तक जाहीर केलं. ट्रम्पने सुद्धा अमेरिकेत 100 दिवसाचा कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्र किती कमजोर झाला, त्याची श्वेतपत्रिका काढा. 106 हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहण्याचा तुमचा अधिकार नाही, लायकी शब्द वापरणार नाही. 106 हुतात्म्यांच्या स्वप्नांना संपवून टाकलं. व्यापाऱ्यांना विकला गेलेला महाराष्ट्र निर्माण केला” अशी टीका संजय राऊत यांनी केली.