Shravan 2025 : श्रावण मासारंभ! सुरुवात-समाप्ती; शिवामूठ आणि पूजा विधीचे महत्त्वही जाणून घ्या

Shravan 2025 : श्रावण मासारंभ! सुरुवात-समाप्ती; शिवामूठ आणि पूजा विधीचे महत्त्वही जाणून घ्या

हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना हा अत्यंत धार्मिक महत्त्व असलेला महिना मानला जातो. यादरम्यान जाणून घ्या शिवामूठ आणि पूजा विधीचे महत्त्व...
Published by :
Prachi Nate
Published on

हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना हा अत्यंत धार्मिक महत्त्व असलेला महिना मानला जातो. हा महिना भक्ती, श्रद्धा आणि उपासनेचा काळ असून विशेषतः भगवान शंकराची उपासना करण्याचा हा पवित्र कालखंड आहे. यंदा श्रावण महिना 25 जुलै 2025 पासून सुरू होत असून 23 ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहे. या कालावधीत एकूण चार श्रावणी सोमवार असणार आहेत. हे सोमवार शिवभक्तांसाठी विशेष महत्त्वाचे मानले जातात. अनेक भाविक या कालावधीत उपवास करतात, शिवमंदिरांना भेट देतात आणि विविध पूजाविधी करतात.

श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भगवान शंकराच्या शिवलिंगावर विशिष्ट धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे. या परंपरेला 'शिवामूठ' असे म्हणतात. पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजे 28 जुलै रोजी तांदूळ अर्पण केला जातो. दुसऱ्या सोमवारी, 4 ऑगस्ट रोजी तीळ अर्पण केले जातात. तिसऱ्या सोमवारी, 11 ऑगस्ट रोजी मूग आणि चौथ्या सोमवारी, 18 ऑगस्ट रोजी जव अर्पण करण्याची प्रथा आहे. ही धार्मिक प्रक्रिया अतिशय श्रद्धेने केली जाते आणि त्यानंतर भक्तगण पूजन, नैवेद्य आणि आरती करतात.

शिवामूठ वाहण्यामागे एक धार्मिक श्रद्धा आहे की भगवान शंकराला मूठभर धान्य अर्पण केल्यास घरात सुख, शांतता आणि समृद्धी नांदते. तसेच जीवनातील अडथळे, रोगराई आणि अडचणी दूर होतात. त्यामुळेच अनेक भक्त हे विधी अत्यंत भक्तिभावाने करतात. श्रावण महिन्यात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी बेलपत्र, रुईची पाने, गोकर्णाची फुले, शमीची पाने, धोतऱ्याची फळं, आघाड्याची पाने, भस्म, लाल चंदन, बेलफळ अर्पण करणे शुभ मानले जाते. पूजा करताना सर्वप्रथम शिवलिंगावर कापसाचे वस्त्र अर्पण करावे. त्यानंतर बेलपत्र, फळे व फुले वाहून शेवटी शिवामूठ अर्पण करावी.

उजव्या हातात मूठभर धान्य घेऊन त्यावर पाणी शिंपडून तीन वेळा शिवलिंगावर अर्पण करावे. यानंतर महादेवाची आरती करावी आणि शिव स्तोत्र, शिव चालीसा यांचे पठण करावे. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी भक्तांनी 'ॐ नमः शिवाय' मंत्राचा जप करणे, रुद्राभिषेक करणे, व्रत पाळणे आणि सकाळी स्नान करून शिवलिंगावर जल व बेलपत्र अर्पण करणे हे सर्व प्रभावी उपाय मानले जातात. श्रावण महिना हा आत्मशुद्धी, संयम आणि साधनेसाठी उत्तम काळ असून अनेक साधक या महिन्यात कठोर व्रत आणि साधना करतात.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com