खासदार श्रीकांत शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल, म्हणाले; "खोटं बोला, पण..."
Shrikant Shinde On Mahavikas Aaghadi : लोकांमध्ये फेक नरेटिव्ह पसरवण्यात आलं. हे फेक नरेटिव्ह आम्ही पुसू शकलो नाही. खोटं बोला पण रेटून बोला अशी परिस्थिती निर्माण झाली होती. काही विशिष्ट समाजाला आणि काही जातींना घेऊन त्यांनी केलं. संविधान बचाव अशा खोट्या गोष्टी लोकांपर्यंत पोहचवल्या. त्यामुळे लोकांनी त्यांना बळी पडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना एकत्रितपणे मतदान केलं. त्यामुळे त्यांचा विजय झाला असेल, पण ही तात्पुरती गोष्ट आहे. ही कायमस्वरूपी गोष्ट नाही, असं म्हणत शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
खोट्या नरेटिव्हबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाष्य केलं होतं. ते म्हणाले, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं हे सरकार आहे. लोकसभा निवडणुकीत काही लोकांनी फेक नरेटिव्ह सेट केले. खोट्या नरेटिव्हच्या माध्यमातून चुकीचे गैरसमज पसरवले. घटना बदलणार, संविधान बदलणार, आरक्षण रद्द होणार, अशी भीती पसरवली. २०१५ ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संविधानदिन साजरा केला. केंद्र आणि राज्य सरकारने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडनमधील घर स्मारक बनवलं.
जगाला हेवा वाटेल असं इंदू मीलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आपण उभारत आहोत. जोपर्यंत सूर्य, चंद्र राहिल, तोपर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं नाव राहिल. पण गावागावात काही लोक गेले, त्यांनी फेक नरेटिव्ह पसरवला. संविधान बदलणार म्हणून यांना ४०० जागा पाहिजेत, एसी-एसटीचं आरक्षण जाणार असा प्रचार करण्यासाठी आदिवासी पाड्यांमध्ये लोकं गेली, असंही शिंदे म्हणाले.