खासदार श्रीकांत शिंदेंचं मोठं विधान, पत्रकार परिषदेत म्हणाले; "कोल्हापूरमध्ये महापूरावर नियंत्रण ठेवण्यासाठी..."
गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात निधी देण्याचं काम करण्यात आलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विकासकामं करण्यात आली आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त भर देण्याचं काम करण्यात आलं आहे. कोल्हापूरमध्ये येणाऱ्या महापूरावर नियंत्रण ठेवण्यासाठी वर्ल्ड बँककडून ३२०० कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर झाला आहे. भविष्यात पूर परिस्थिती नियंत्रणात कशी येईल, यासाठी राज्य सरकार काम करत आहे. तसंच ७५० कोटींचा पंचगंगा प्रदुषण आराखडा तयार झालेला आहे. यासाठी निधी देण्याचं कामही केलं जाईल, असं आश्वासन खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिलं.
श्रीकांत शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं काम केलं आहे. केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी सहा हजार रुपये दिले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना १२ हजार रुपये मिळत आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात ३५ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: कोल्हापूर आणि हातकणंगले मध्ये राहिले होते. प्रचार कसा सुरु आहे, प्रचाराला अधिक गती कशी मिळेल, यासाठी मेळावे आणि सभा घेतल्या जात आहेत. हातकणंगले लोकसभेचे उमेदवार धेर्यशील माने यांच्यासाठी सभा घेतल्या.
सर्व ठिकाणी वातावरण उत्साहाचं आहे. सभेला गावातील लोक मोठ्या संख्येत उपस्थित राहत आहेत. आढावा घेतल्यानंतर धेर्यशील माने यांनी त्यांच्या मतदारसंघात केलेल्या कामांवर लोक खूश आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षात हातकणंगलेमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला आहे. प्रत्येक गावात आणि विधानसभेत मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचं काम धेर्यशील माने यांनी केलं आहे. येणाऱ्या ७ तारखेला धेर्यशील माने मोठ्या मताधिक्क्यानने निवडून येतील, असा विश्वासही श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.