'काळजी करू नको आदित्य..' आदित्य ठाकरेंच्या पोस्टवरील सिमी गरेवाल यांची कमेंट चर्चेत
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने काल (११ मे) सुनावला आहे. न्यायालयाने शिंदे गट आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे काही निर्णय चुकीचे आणि बेकायदेशीर असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे. शिंदे गटाने भरत गोगावले यांची प्रतोदपदी केलेली नियुक्तीही बेकायदेशीर होती, असं न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बहुमत सिद्ध करण्याआधीच राजीनामा दिला होता, त्यामुळे त्यांना तत्कालीन सरकारची परिस्थिती पूर्ववत करता येणार नाही, अशी महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. यानंतर सोशल मीडियावर या निर्णयाबद्दल भरपूर प्रतिक्रिया येऊ लागल्या.
दरम्यान युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर सरकारबद्दल टीका करत प्रतिक्रिया दिली होती. सरकार असंवैधानिक, बेकायदा आणि अनैतिक असल्याचे म्हंटले आहे. हाच एक मार्ग मिंधे भाजपा सरकारकडे बघण्याचा आहे, असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.
आदित्य ठाकरेंच्या या पोस्टवर आता ज्येष्ठ सिने-अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी कमेंट केली आहे. आपल्या कमेंटमध्ये अभिनेत्री गरेवाल म्हणतात, “आदित्य काळजीचं कारण नाही, आता पुढील जबाबदारी आपल्यावर आहे, महाराष्ट्राची जनता मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीवर केलेला हा बेकायदेशीर कब्जा नक्कीच हटवेल.”
सिमी गरेवाल यांच्या या कमेंटवर आदित्य ठाकरे यांनी त्यांचे आभार मानत पुढे लिहितात, “आमच्या सरकारचा ताबा घेण्यामध्ये पूर्वीच्या राज्यपालांची भूमिका आणि मदत लोकशाही आणि राज्यघटना दडपल्यासारखी होती. त्यांनी राज्यपाल म्हणून नव्हे तर पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम केले. जर काही नैतिकता आणि लाज उरली असेल तर असंवैधानिक मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. त्यांचा सत्तेचा लोभ उघड आहे. पण नैतिकता आणि लोकशाही सर्वोच्च असली पाहिजे”