Special Report On Thackeray Bandhu। राज-उद्धव यांच्या दुश्मनीचा इतिहास काय? काय घडलं, कुठे बिनसलं?

Special Report On Thackeray Bandhu: राज-उद्धव यांच्या दुश्मनीचा इतिहास काय? काय घडलं, कुठे बिनसलं?

ठाकरे बंधु: उद्धव-राज यांच्या राजकीय संघर्षाचा इतिहास आणि एकत्र येण्याच्या चर्चेचा वेध.
Published by :
Riddhi Vanne
Published on

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच घराण्यातील दोन फायरब्रॅण्ड नेते आहेत. रक्ताच्या नात्यातले दोन सख्खे भाऊ राजकीय पटलावर मात्र या दोघांच्या वाटा वेगवेगळ्या दिशांना आहेत. पण गेल्या काही दिवसांत हे दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर हे दोघे भाऊ वेगळे का झाले. 20 वर्षांपूर्वी नेमकं असं काय घडलं होतं? की या दोघांमध्ये विस्तवही जात नव्हता.

आधी राज ठाकरे यांनी एक पाऊल पुढे टाकलं... ((19 एप्रिल 2025))

नंतर त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनीही एक पाऊल पुढे टाकलं... ((19 एप्रिल 2025))

या दोन्ही भावांच्या या भूमिकांनी अवघ्या महाराष्ट्राच्या भुवया उंचावल्या. नंतर मात्र या दोघांशिवाय इतर नेते बोलत राहिले.

खरंतर गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या एकत्र येण्याबाबतच्या चर्चा सुरू आहेत. पण 20 वर्षांपूर्वी नेमकं काय झालं होतं? की हे रक्ताचे सख्खे चुलत भाऊ एकमेकांचे पक्के वैरी झाले. असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय.

नाव- उद्धव बाळासाहेब ठाकरे, जन्म 27 जुलै 1960, पद- शिवसेना पक्षप्रमुख

नाव- राज श्रीकांत ठाकरे, जन्म 14 जून 1968... पद- अध्यक्ष- महाराष्ट्र नवनिर्माण सेना

एकाच घरातील हे दोन भाऊ रक्ताच्या नात्यातले नेते बाळासाहेब ठाकरे नावाच्या धगधगत्या वादळाच्या कुशीत आणि मुशीत वाढलेले नेते आहेत. शिवसेना नावाच्या झंझावाती पक्षाच्या झेंड्याखाली दोघांचंही नेतृत्व फुललं आणि वाढलं. बाळासाहेब ठाकरेंनी या दोन्ही नेत्यांच्या खांद्यावर ठेवलेल्या हाताचा फोटो पाहिला की महाराष्ट्राचं मन आजही हळवं होतं. बाळासाहेब ठाकरेंनी पुत्र म्हणून उद्धव ठाकरे आणि पुतण्या म्हणून राज ठाकरेंमध्ये कधीही भेदभाव केला नाही. दोघांनाही बाळासाहेबांनी बोटाला धरून राजकीय मैदानात पाऊल टाकायला शिकवलं. पण एकदा मात्र भूकंप झाला आणि हे दोन्ही भाऊ वेगवेगळे झाले. कधीकाळी मांडीला मांडी लावणारे हे नेते एकमेकांविरोधात दंड थोपटू लागले. पण असं नेमकं काय घडलं की हे सख्खे चुलत भाऊ एकमेकांचे पक्के राजकीय वैरी झाले.

1995 साली राज ठाकरेंनी शिवउद्योग सेनेची धुरा हाती घेतली. राज ठाकरेंच्या कामांचा धडाका जोरात सुरू होता. बाळासाहेबांचे वारसदार म्हणून राज ठाकरेंकडे पाहिलं जात होतं. 1997 साली मुंबई मनपाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे सक्रिय झाले. 2002 साली मुंबई मनपा निवडणुकीची जबाबदारी उद्धव यांच्याकडे सोपवण्यात आले. राज ठाकरेंसह त्यांचे जवळच्या नेत्यांना डावलल्याचे आरोप झाले. 30 जानेवारी 2003 रोजी राज यांनी कार्याध्यक्षपदासाठी उद्धव यांच नाव सुचवलं, राज ठाकरे नाराज असल्याच्या चर्चा महाराष्ट्रात रंगल्या. 18 डिसेंबर 2005 ला राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष सोडण्याची घोषणा केली. 9 मार्च 2006 रोजी राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली, झेंडा जाहीर केला

तर अशा पद्धतीने राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय दरी निर्माण झाली मग सुरू झाला ठाकरे घराण्यातला कडवा राजकीय संघर्ष... हे दोन्ही नेते एखाद्या कौटुंबिक सोहळ्यात एकत्र दिसायचे. मात्र त्यांचं राजकीय वैर मात्र तसंच पेटतं राहिलं. आता राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना डोळा मिचकावत एकीची साद घातली. तर त्यावर उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिलाय. त्यामुळे हे दोन्ही नेते 20 वर्षांनंतर पुन्हा एकत्र येणार का? हे पाहायला हवं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com