Tuljabhavani Temple : तुळजापूरमध्ये संक्रांतीच्या दिवशी महिलांसाठी विशेष नियम

Tuljabhavani Temple : तुळजापूरमध्ये संक्रांतीच्या दिवशी महिलांसाठी विशेष नियम

मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संक्रांतीनिमित्त ओवसण्यासाठी मंदिरात येणाऱ्या महिला भाविकांसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

Tuljabhavani Temple मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संक्रांतीनिमित्त ओवसण्यासाठी मंदिरात येणाऱ्या महिला भाविकांसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. आधार कार्ड असल्याशिवाय महिलांना मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही, अशी स्पष्ट माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तसेच ओवसण्यासाठी तुळजापूर शहरासह संपूर्ण मराठवाडा आणि राज्याच्या विविध भागांतून हजारो महिला भाविक मंदिरात दाखल होतात. विशेषतः सायंकाळच्या वेळेत महिला भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने नियोजन आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. याच पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, महिलांच्या ओवसणीच्या परंपरेदरम्यान गर्दीचे योग्य नियमन, सुरक्षितता आणि गैरप्रकार टाळण्यासाठी आधार कार्ड तपासणीचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचारी आणि स्वयंसेवकांच्या मदतीने आधार कार्डची पडताळणी केली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे भाविकांची ओळख सुनिश्चित होणार असून गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाणार आहे.

दरम्यान, मकर संक्रांतीच्या दिवशी सायंकाळच्या वेळेत महिला भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सायंकाळी ५ ते ६ या वेळेत पुरुष भाविकांना मंदिरात प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे. हा निर्णय केवळ महिला भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि ओवसणीचा विधी शांततेत पार पडावा यासाठी घेतल्याचे मंदिर संस्थानने स्पष्ट केले आहे.

मंदिर संस्थानने सर्व महिला भाविकांना आवाहन केले आहे की, संक्रांतीच्या दिवशी मंदिरात येताना आधार कार्ड अनिवार्यपणे सोबत ठेवावे. तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, जेणेकरून भाविकांचा अनुभव सुलभ आणि सुरक्षित राहील. या निर्णयामुळे काही भाविकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्या तरी बहुतांश भाविकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com