Board Exams 2026 : दहावी–बारावी परीक्षांमध्ये कडक बंदोबस्त; प्रत्येक वर्गात CCTV अनिवार्य

Board Exams 2026 : दहावी–बारावी परीक्षांमध्ये कडक बंदोबस्त; प्रत्येक वर्गात CCTV अनिवार्य

राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शिक्षण मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शिक्षण मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदापासून प्रत्येक परीक्षा केंद्रातील प्रत्येक खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून, कॉपी, गोंधळ किंवा इतर अनुचित प्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) माहितीनुसार, बारावीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे. त्यापूर्वी, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2026 दरम्यान पार पडणार आहेत. दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रकही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

सीसीटीव्ही बसवण्यामागचा उद्देश म्हणजे परीक्षांमध्ये होणाऱ्या कॉपीच्या घटनांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवणे. मागील काही वर्षांत काही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मंडळाने हा कडक निर्णय घेतला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे परीक्षा सुरू असताना सतत कार्यरत ठेवणे बंधनकारक असेल. तसेच, रेकॉर्ड केलेले फुटेज ठरावीक कालावधीपर्यंत जतन करणेही आवश्यक असेल.

परीक्षा केंद्र चालक, शाळा व्यवस्थापन आणि केंद्रप्रमुखांवर सीसीटीव्ही यंत्रणा सुरळीत चालू ठेवण्याची जबाबदारी असणार आहे. एखाद्या केंद्रात सीसीटीव्ही कार्यरत नसल्यास किंवा नियमांचे उल्लंघन झाल्यास त्या केंद्रावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. गरज पडल्यास संबंधित केंद्राची मान्यता रद्द करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. परीक्षांमध्ये समान संधी मिळेल, मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, अशी भावना अनेक पालकांनी व्यक्त केली आहे. शिक्षक संघटनांनीही सीसीटीव्ही निर्णयामुळे परीक्षेतील शिस्त अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

बारावीच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षांसाठी आवश्यक तयारी, प्रयोगशाळा, साहित्य आणि शिक्षकांची उपलब्धता वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी अधिकृत वेळापत्रक आणि केंद्रांची माहिती शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरून तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कडक नियम, आधुनिक तंत्रज्ञान आणि पारदर्शक व्यवस्थेमुळे यंदाची दहावी-बारावी परीक्षा अधिक विश्वासार्ह ठरणार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com