"सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिल्यानंतर सुप्रिया सुळेंना पराभवाची भीती", चित्रा वाघ यांनी स्पष्टच सांगितलं
बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. काल शनिवारी अजित पवार गटाने सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिलीय. सुनेत्रा वहिनी निवडणूक लढणार आहेत. हे पाहून तुमच्या मनात जो उमाळा अचानक उफाळून आलाय, तो मायेचा नसून पराभवाच्या भीतीचा आहे, असं म्हणत चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे.
वाघ माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, भाजपला कुणाचं घर फोडायची गरज नाही. घरातली माणसं सूज्ञ आहेत. ते व्यापक विचार करूनच निर्णय घेतात. सुनेत्रावहिनींना आता आई-आई म्हणता, त्यांना राजकारणातून बेदखल करायची तेव्हा केवढी घाई झाली होती, हे महाराष्ट्रासमोर आहे. एकीकडे राजकारणात आपण मेरिटवर निवडून येतो असं म्हणायचं आणि दुसरीकडे आई-वडिलांच्या पुण्याईचं चंदन उगाळायचं, याने आता पदरात काही पडणार नाही.