महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. न्यायालयाची वेळ संपल्याने सुनावणी स्थगित करण्यात आली. काल ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केल्यानंतर आज शिंदे गटाच्यावतीनेही जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आजच्या युक्तीवादानंतर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.
आज सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाच्यावतीने वरिष्ठ वकील हरीश साळवे यांनी बाजू मांडली. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील सरकार कोसळण्याला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचे म्हटलं. “उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा दिला. त्यांना राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी बोलावलं होतं. २८ जून रोजी ही बहुमत चाचणी होणार होती. मात्र, त्यांनी त्यापूर्वी राजीनामा दिला. उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते, तर काही मुद्दे उपस्थित करता आले असते. उद्धव ठाकरेंचा राजीनामा अवैध ठरवला, तरच या चर्चांना अर्थ उरेल. त्यामुळे सरकार कोसळण्याला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत”, असा युक्तिवाद हरीश साळवे यांच्याकडून करण्यात आला.