Ajit Pawar Sharad Pawar together
Ajit Pawar Sharad Pawar together

Supriya Sule: प्रेमानं मागा सगळं देऊन टाकू, ताईंचं दादांसाठी सूचक विधान?

सुप्रिया सुळे यांनी केलेल्या सूचक विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे दोन्ही पवार एकत्र येणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.
Published by :
Published on

महाराष्ट्राच्या राजकारणात २३ नोव्हेंबर २०१९ रोजी कधी न घडलेली अशी एक घटना घडली. भल्या पहाटे अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करून शपथविधी उरकला. भाजपा आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे वाटपावरून वाद झाला होता. शिवसेनेने भाजपाऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह जाण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरेंची काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा सुरु होती. अशातच पहाटेत्या शपथविधीच्या एक दिवसआधी २२ नोव्हेंबर २०१९ रोजी संध्याकाळी अजित पवार हे शरद पवार उपस्थित असलेल्या बैठकीतून तडकाफडकी निघून गेले.

पहाटेच्या शपथविधीचा अंक

२३ नोव्हेंबर २०१९ रोजी अजित पवार यांनी तत्कालीन राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या घटनेला ५ वर्षे उलटून गेली आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या इतिहासात हा क्षण कोरला गेला. हे औट घटकेचं सरकार ७२ तासांचं होतं.

काकांची सोडली साथ, महायुती सरकारसोबत मिळवला हात

त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. हे सरकार ही अडीच वर्षे चाललं. कारण शिवसेनेमधून एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेवर आपला दावा सांगितला. राज्यामध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप असं महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा वरचेवर ऐकू येत होत्या. अखेर अजित पवार यांनी आपले काका म्हणजेच शरद पवार यांची साथ सोडत महायुतीसोबत हातमिळवणी केली आणि महायुती सरकारमध्ये सामिल झाले.

दोन्ही पवार एकत्र येणार?

विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षफुटीनंतर शिंदेंच्या शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेचा कौल मिळण्याचं अग्निदिव्य पार करणं महत्त्वाचं होतं. त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेने महायुती सरकारला कौल दिला. निवडणुकांनंतर राज्यात नव्याने महायुती सरकार स्थापनेच्या घडामोडी सुरु असताना शरद पवार आणि अमित शाह यांच्यात दिल्ली येथे भेट घडली होती. त्यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला अजित पवार यांच्या मातोश्री यांनी पवार कुटुंब एकत्र यावं यासाठी साकडं घातलं होतं. त्यानंतर गुरुवारी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान दोन्ही पवार एका मंचावर पाहायला मिळाले. तसेच दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचं ही कळतंय.

दरम्यान, शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सूचक विधान केलं आहे. प्रेमानं मागा सगळं देऊन टाकू. माझी कोणत्याही पदासाठी महत्वकांक्षा नाही. रिश्ते हमेशा रहते हैं असं खासदार सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. खरंच दोन्ही पवार एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com