टेमघर धरणातून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी 488 कोटी 53 लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता
टेमघर धरण प्रकल्पाच्या अपूर्ण कामांसह गळती थांबवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांसाठी राज्य मंत्रिमंडळाने 488 कोटी 53 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.
मुठा नदीवर बांधलेले हे दगडी धरण लवार्डे-टेमघर (ता. मुळशी) येथे आहे आणि त्याची साठवण क्षमता 3.812 अब्ज घनफूट आहे. या प्रकल्पातून पुणे शहराला दरवर्षी 3.409 अब्ज घनफूट पाणीपुरवठा केला जाणार असून, धरणाच्या खालच्या भागातील पाच कोल्हापूरी बंधाऱ्यांमधून नऊ गावांना सिंचनासाठी पाणी दिले जाणार आहे.
2010-11 पासून धरण पूर्ण क्षमतेने भरले जात असून, त्यात लक्षणीय गळती होत असल्याचे लक्षात आल्याने गळती थांबवण्यासाठी विशेष कामे हाती घेण्यात येणार आहेत. या अनुषंगाने फेब्रुवारी 2025 मध्ये प्रारंभिक मान्यता मिळाल्यानंतर आता दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, ज्यामुळे उर्वरित कामे गतीने पार पडणार आहेत.