ईडी आणि सीबीआयला सीमेवर पाठवा. दुश्मन शरणागती पत्करून भाजपामध्ये प्रवेशच करतील; सामनातून हल्लाबोल
ग्रेनेड हल्ल्यात पाच जवानांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजौरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी जवानांच्या वाहनावर हल्ला केल्यावर ही घटना घडली. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले, तर एक जखमी झाला.राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. त्यामुळं ट्रकला भीषण आग लागली. मुसळधार पावसामुळं कमी दृश्यमानतेचा फायदा घेत अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे. सामनातून म्हटले आहे की, ईडी, सीबीआय आणि आयकर ही मोदी आणि शाह यांची शस्त्रे आहेत. पण त्यांना चिनी आणि पाकिस्तानी अतिथी घाबरतात असं दिसत नाही. जम्मू-काश्मीरचे विभाजन केले. त्यांचा पूर्ण राज्याचा दर्जा काढला.काल काश्मीरमध्ये हल्ला झाला. मोदी त्यावर तरी काही बोलतील का? युद्धाची भाषा नको, बुद्धाची भाषा नको, निदान प्रतिकाराची भाषा तरी करा. असे सामनातून म्हटले आहे.
पुढे सामनातून म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी कालपर्यंत युद्धाची भाषा बोलत होते. आता बुद्धाची भाषा बोलत आहेत. सत्य सांगायचं तर पाकिस्तानसमोर ते युद्धाची भाषा करतात.देशाला मजबूत पंतप्रधान आणि कणखर गृहमंत्री लाभलेले असताना जवानांवर अतिरेकी नामक अतिथीं हल्ले करतातच कसे?देशातील सर्व विरोधी पक्षांना मोडून विस्कळीत करायचे आणि भाजपला लोकसभेत विजय मिळवून द्यायचा याची जबाबदारी शाह यांच्याकडेच आहे. ईडी आणि सीबीआयला सीमेवर पाठवा. दुश्मन शरणागती पत्करून भाजपमध्ये प्रवेशच करतील, अशी बोचरी टीकाही अग्रलेखातून करण्यात आली आहे.