Harshvardhan Sapkal : 'भाजप ही विरोधकांची नेते खाणारी चेटकीण'; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा थेट वार

Harshvardhan Sapkal : 'भाजप ही विरोधकांची नेते खाणारी चेटकीण'; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा थेट वार

राज्यात सध्या गुंडगिरी, दडपशाही आणि सत्तेचा गैरवापर उघडपणे (Congress) सुरू असून सत्ताधारी भाजप विरोधकांना संपवण्याच्या मोहिमेवर निघाली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

Ahilyanagar Congressराज्यात सध्या गुंडगिरी, दडपशाही आणि सत्तेचा गैरवापर उघडपणे (Congress) सुरू असून सत्ताधारी भाजप विरोधकांना संपवण्याच्या मोहिमेवर निघाली आहे. भाजप ही विरोधकांची नेते खाणारी चेटकीण’ बनली असून फोडाफोडी, धमकावणं आणि खोट्या आरोपांचं राजकारण हाच त्यांचा एकमेव अजेंडा आहे अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत केली. अहिल्यानगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सपकाळ बोलत होते. यावेळी खासदार निलेश लंके, काँग्रेस शहराध्यक्ष दीप चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

सपकाळ म्हणाले, भाजप सत्तेत आल्यापासून राज्यात गुंडशाहीला मोकळं रान मिळालं आहे. आज विरोधकांना प्रचारासाठी मैदान मिळत नाही, आमच्या हालचालींवर पाळत ठेवली जाते. सरकारमार्फत हेरगिरी सुरू असून हा लोकशाहीवर थेट हल्ला आहे. भाजपकडे आता निष्ठावंत कार्यकर्ते उरलेले नाहीत. त्यामुळे काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांचे नेते पळवणे, फोडणे हाच त्यांचा धंदा झाला आहे. भाजप म्हणजे विरोधकांची नेते गिळणारी चेटकीण आहे, असा घणाघात सपकाळ यांनी केला.

महापालिका-नगरपालिका निवडणुकांमध्ये रस्ते, वीज, पाणी यांसारखे मूलभूत प्रश्न बाजूला सारून मराठी-उर्दू, महाराष्ट्रीयन-परप्रांतीय असे वाद पेटवून विकासाचे प्रश्न गायब करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसंच, राज्यातील सत्ताधारी पक्ष एकमेकांवर टीका करताना दिसत असले तरी ही नुरा कुस्ती असल्याचा संशय व्यक्त करत, आधी स्वतः सत्तेतून बाहेर पडा, मग टीका करा असा टोला सपकाळ यांनी लगावला.

भाजपने पुसून टाका हाच अजेंडा राबवला असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की विलासराव देशमुख, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांचे अस्तित्व पुसण्याचे प्रयत्न झाले. दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी तयार करून भाजपने हे सिद्ध केले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाच्या योजना बंद केल्या जात असून लालकृष्ण आडवाणी व मुरली मनोहर जोशी यांनाही डावलण्यात आले आहे. आरएसएस कार्यालयांमध्ये केवळ मोदी-शहा यांचेच फोटो लावण्याचा अजेंडा असून याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साथ देत असल्याची टीकाही त्यांनी केली.

यंदाच्या निवडणुकांत बंदुका व कोयत्यांच्या जोरावर दहशत निर्माण केली जात असून सोलापूर, खोपोली, अकोट येथे हत्या झाल्या तरी सरकार गंभीर नसल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. निवडणूक आयोगही पक्षपाती भूमिका घेत असून निष्पक्ष निवडणुका होतील का, याबाबत शंका आहे, असेही ते म्हणाले. लोकशाही-संविधान वाचवण्यासाठी लढा सुरू आहे काँग्रेस काही ठिकाणी स्वतंत्र, तर अनेक ठिकाणी आघाडीसोबत लढत आहे.

बहुजन वंचित आघाडीचा नवा पाठिंबा मिळाला असून लोकशाही व संविधान वाचवण्यासाठीच ही निवडणूक लढवत आहोत,असे सपकाळ यांनी स्पष्ट केले. यावेळी खासदार निलेश लंके म्हणाले, सत्तेच्या माध्यमातून दहशत, बंदूक दाखवून धमकावणे सुरू आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. या सर्व दडपशाहीला सामोरे जाऊन आम्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी कटिबद्ध आहोत. सत्ताधाऱ्यांनी गोरगरिबांचे पैसे देण्याऐवजी राजकीय स्वार्थासाठी जनतेला वेठीस धरल्याचा आरोप करत, प्रत्येक सभा माझ्या नावाने पूर्ण होत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com