BMCResults : मुंबई महापालिकेत भाजपचा विजय, पण ठाकरे गटाचा संघर्ष निर्णायक

BMCResults : मुंबई महापालिकेत भाजपचा विजय, पण ठाकरे गटाचा संघर्ष निर्णायक

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असले, तरी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निकालांकडे लागले होते.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असले, तरी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निकालांकडे लागले होते. तब्बल २५ वर्षांपासून ठाकरे घराण्याचा बालेकिल्ला असलेला मुंबई महापालिकेचा गड यंदा भाजप-शिंदे गटाच्या महायुतीने काबीज केला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) ६५ जागांवर समाधान मानावे लागले.

या निकालांनंतर भाजपने ठाकरे गटावर निर्णायक मात केल्याची चर्चा सुरू झाली असली, तरी अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते उद्धव ठाकरे यांनी आपला जनाधार टिकवून ठेवण्यात यश मिळवले आहे. २०१७ च्या निवडणुकीत ८४ जागा मिळवणाऱ्या ठाकरे गटाने यावेळी काही जागा गमावल्या, तरी मुंबईच्या मराठीबहुल भागांमध्ये आपला प्रभाव कायम राखला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाकडे गेले. विधानसभा निवडणुकीतील यशानंतर ‘खरी शिवसेना’ शिंदेंचीच असल्याचा दावा केला जात होता. मात्र, महापालिकेच्या निकालातून उद्धव ठाकरेंनी मुंबईत आपले अस्तित्व पुन्हा एकदा ठळकपणे सिद्ध केले आहे. शिंदे गटासोबत ६२ आजी-माजी नगरसेवक गेले असतानाही ठाकरे गटाचा आकडा निम्म्यावर येईल, अशी शक्यता फोल ठरली.

भाजपची प्रचंड ताकद आणि शिंदे गटाच्या आव्हानामुळे मराठी मतांचे विभाजन झाले असतानाही ठाकरे गटाने ६५ जागांवर विजय मिळवला. यामध्ये मनसेच्या ६ जागांची भर घातल्यास मराठी राजकारणाचा एकूण आकडा ७१ पर्यंत पोहोचतो. सत्ता गमावली असली, तरी ‘ठाकरे’ हा ब्रँड आजही मुंबईत जिवंत असल्याचे या निकालातून स्पष्ट होते.

दुसरीकडे, शिंदे गटाला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. भाजपकडून ९० जागा मिळाल्यानंतर ४० ते ५० जागा सहज जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला जात होता. मात्र प्रत्यक्षात शिंदे गटाला केवळ २९ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपलाही २०१७ च्या तुलनेत केवळ सहा जागांचीच वाढ करता आली. २२७ जागांच्या मुंबई महापालिकेत भाजप-शिंदे गटाच्या महायुतीने बहुमताचा आकडा पार केला असून, मुंबईच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पक्ष मिळालेल्या जागा

भारतीय जनता पार्टी (BJP) ८९

शिवसेना (ठाकरे गट) ६५

शिवसेना (एकनाथ शिंदे) २९

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २४

एआयएमआयएम (AIMIM) ०८

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) ०६

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ०३

समाजवादी पार्टी (SP) ०२

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ०१

एकूण २२७

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com