'Good day' Britannia Company : 'गुड डे' बिस्किटमध्ये जीवंत अळ्या; कंपनीला करावी लागणार इतक्या रुपयांची नुकसानभरपाई
Larvae in Britannia Company's Good Day Biscuits : ब्रिटानिया कंपनीच्या गुड डे बिस्किटांमध्ये जीवंत अळी सापडल्याप्रकरणी महिलेने केलेल्या तक्रारींवर न्यायालयाने दिलासादायक निर्णय दिला. या प्रकरणात बिस्कीट उत्पादन कंपनीने महिलेला 1.50 लाख रुपये आणि ज्या दुकानातून बिस्कीटचा पुडा खरेदी केला. त्या दुकानदारानं 25000 रुपये अशी एकूण 1 लाख 75 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश न्यायालयातून देण्यात आला आहे. यामुळे आता दूषित आणि सदोष उत्पादने विक्री करणाऱ्यावर निश्चितच या निर्णयामुळे वचक बसणार आहे.
32 वर्षीय महिलेने 2019 मध्ये चर्चगेट स्टेशनवरून एक ब्रिटानिया कंपनीचा बिस्कीटपुडा खरेदी केला होता. त्यातील दोन बिस्किटे खाल्यावर त्या महिलेला अस्वस्थ वाटू लागले. दरम्यान तिने तो पुडा पूर्ण उघडला असता धक्कादायक दृश्य समोर आले. त्या बिस्किटांमध्ये चक्क जिवंत अळ्या सापडल्या. याप्रकरणी तिने संबंधित दुकानदाराशी संवाद साधला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्या महिलेने कस्टमर केअरला कॉल केला मात्र त्यांनीही अपेक्षित उत्तरे दिली नाहीत.
यामुळे हतबल झालेल्या महिलेने याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अन्न व प्रशासन विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर त्या बिस्किटांची तपासणी करण्यात आली. प्रयोगशाळेतील चाचणीनंतर उत्पादन सदोष असल्याचे आणि त्यामुळे जीविताला हानी पोहचणार असल्याचे यातून निष्पन्न झाले. या महिलेने ह्या रिपोर्टनुसार ब्रिटानिया कंपनीवर कायदेशीर नोटीस बजावली आणि नुकसानभरपाईची मागणी केली. मात्र आताही ह्या महिलेला कंपनीकडून कोणतेच उत्तर न आल्याने महिलेने शेवटी पोलिसांमध्ये तक्रार केली. ग्राहक तक्रार निवारण आयोगापुढे हा खटला दाखल झाला आणि त्यांनी अन्न व प्रशासन विभागाच्या प्रयोगशाळेतील चाचणीच्या रिपोर्टच्या आधारावर आणि महिलेने सादर केलेल्या पुराव्याच्या आधारावर ब्रिटानिया कंपनीला दोषी ठरवले.
बिस्किटामध्ये जिवंत अळी सापडली याचा अर्थ उत्पादन दूषित आणि सदोष असल्याचं सिद्ध झाल्यामुळे या प्रकरणी कंपनीने त्या महिलेला नुकसानभरपाई म्हणून 1.50 लाख रुपये आणि ज्या दुकानातून बिस्कीटचा पुडा खरेदी केला त्या दुकानदाराने 25000 रुपये अशी एकूण 1 लाख 75 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला. यासाठी या आयोगाने कंपनीला ४५ दिवसांचा अवधी दिला असून त्या आधारे महिलेला या प्रकरणात न्याय मिळवून दिला आहे.