11th Addmission Date Extend : अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ; आता 'या' तारेखपर्यंत घेता येणार प्रवेश
महाराष्ट्रातील अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थ्यांना दिलासा देणारी महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत प्रवेशासाठी मुदतवाढ दिली आहे. आता विद्यार्थ्यांना २२ ऑगस्टपर्यंत अकरावीच्या प्रवेशासाठी संधी उपलब्ध होणार आहे.
सध्या राज्यात जवळपास सर्वच भागांत तुफान पावसाची स्थिती आहे. काही ठिकाणी तर पूरपरिस्थिती निर्माण झाली असून शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत प्रवेश घेणे कठीण झाले होते. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी दिलेली आधीची मुदत २० ऑगस्टवरून वाढवून २२ ऑगस्ट करण्यात आली आहे.
राज्यातील एकूण ९ हजार ५२५ ज्युनियर कॉलेजांमध्ये २१ लाख ५० हजार १३० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जात आहे. आतापर्यंत १२ लाख ३ हजार ४१६ विद्यार्थ्यांनी अकरावीमध्ये प्रवेश घेतला आहे. तरीदेखील अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सर्वांसाठी खुली अशी विशेष फेरी जाहीर करण्यात आली होती. या फेरीत नियमित फेऱ्यांत प्रवेश न मिळालेले विद्यार्थी, पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि एटीकेटी विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.
या खुल्या फेरीची मुदत सुरुवातीला १७ ऑगस्टपर्यंत होती. परंतु मुसळधार पावसामुळे परिस्थिती लक्षात घेऊन ही मुदत आधी २० ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, अजूनही काही ठिकाणी पावसाचे जोरदार संकट कायम असल्याने प्रवेश घेण्यास अडचणी येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून अखेर मुदत पुन्हा वाढवून २२ ऑगस्ट करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे प्रवेशाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असून, कोणताही विद्यार्थी अडचणीत सापडू नये यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.