इंदू मिलमधील स्मारक लवकर पूर्ण होईल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज 66 वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने मुंबईतल्या दादरच्या शिवाजी पार्क परिसरात अनुयायांची गर्दी वाढू लागली आहे. कोरोना नंतर पहिल्यांदाच असा जाहीर कार्यक्रम असल्यानं बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येनं येत आहेत. त्यांच्या व्यवस्थेसाठी प्रशासकीय यंत्रणाही सज्ज आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं आंबेडकरांचे अनुयायी दाखल झाले आहेत. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक ग्वाही दिली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, इंदू मिलमधील स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल. आम्ही आढावा घेत पाहणी केली आहे. बाबासाहेब यांचा आठवणी जपण्याचा काम केलं जाईल. राजगृहवरील ऐतिहासिक ठेवा सुद्धा जपला जाईल. इंदू मिलमधील आंतरराष्ट्रीय स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल.
यासोबतच मुख्यमंत्री म्हणाले की, 'माझ्यासारख्या सर्व सामान्य कुटुंबातील नागरिक आज मुख्यमंत्री झाला हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे घडलं. दलित समाजात रुजलेली न्यूनगंडाची भावना बाबासाहेबांननी काढून टाकली. दलित बांधवांमध्ये जो आत्मविशास निर्माण झाला, त्याचं श्रेय डॉ. आंबडेकरांना जातं.' असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे.