झोपडीधारकांना मिळणार स्वतःचं घर; जितेंद्र आव्हाड म्हणाले...
शुभम कोळी, ठाणे
झोपडीच्या बदल्यात सशुल्क घर मिळणार आहे. यासंबंधीची घोषणा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. झोपडीच्या बदल्यात अवघ्या २ लाख ५० हजार रुपयांत घर मिळणार आहे. शासन निर्णय जारी झाल्याने आता झोपडी धारकांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे.
राज्य सरकारने याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे. यानुसार, मुंबईत झोपडीच्या बदल्यात सशुल्क घर मिळणार आहे. शासनाकडून पुनर्वसन सदनिकेची किंमत अडीच लाख रुपये निश्चिती केली आहे. यात झोपडी असलेल्या जागांचा विकास होणार आहे. यामुळे १ जानेवारी २००० ते १ जानेवारी २०११ या काळातील झोपडी धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाचा फायदा लाखो झोपडीवासियांना होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, फडणवीस यांचं मी अभिनंदन करतो, हा निर्णय चांगला आहे, गोरगरिबांना न्याय देणार आहे,. पण आम्ही एक निर्णय घेतला होता की एलवाय मिळाल्यानंतर अडीच वर्षांनी त्यांना ते घर विकता आलं पाहिजे, तो निर्णय त्यांनी घ्यावा, कारण झोपडपट्टीला एल वाय दिल्यानंतर कधी विकसित होईल याचं काही वय वर्ष नसतं त्यामुळे गरीब माणसाला झोपडी ही आजारात कामी येते, लग्नात कामी येते, झोपडी हे त्याचं धन असतं,जर एलवाय दिला आणि तिथे बिल्डिंग बनायला जर तीस वर्षे लागत असतील तर त्याची तीस वर्षे वाया जातात त्यामुळे देवेंद्रजींना माझी विनंती आहे की त्यांनी हा निर्णय घ्यावा. असे त्यांनी सांगितले आहे.