Bhai Jagtap : 'मुंबईत काँग्रेसचा महापौर होणार' भाई जगताप यांचं वक्तव्य
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असताना काँग्रेस नेते आणि माजी आमदार भाई जगताप यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “मुंबईत काँग्रेसचाच महापौर होणार असून, काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय मुंबई महापालिकेत महापौर बसूच शकत नाही,” असा ठाम दावा भाई जगताप यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मुंबईच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
भाई जगताप म्हणाले की, मुंबई महापालिकेत काँग्रेसची ताकद आजही निर्णायक आहे. कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापन करायची असेल, तर काँग्रेसचा पाठिंबा अपरिहार्य आहे. “मुंबईतील अल्पसंख्याक, मध्यमवर्गीय, कामगार आणि झोपडपट्टीतील मतदार आजही काँग्रेसवर विश्वास ठेवतात. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसची भूमिका किंगमेकरचीच नाही, तर थेट सत्ताधारी पक्षाची असेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपवर टीका करताना भाई जगताप म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांत भाजपने मुंबईकरांना केवळ आश्वासनं दिली, मात्र मूलभूत प्रश्न सोडवण्यात अपयश आलं. पाणीटंचाई, रस्त्यांची अवस्था, आरोग्य व्यवस्था आणि भ्रष्टाचार हे मुद्दे अजूनही कायम आहेत.
दरम्यान, भाई जगताप यांच्या या वक्तव्यामुळे भाजप आणि इतर पक्षांची डोकेदुखी वाढली असून, मुंबई महापालिका निवडणूक अधिकच चुरशीची होणार असल्याचं स्पष्ट होत आहे. आता प्रत्यक्ष निवडणुकीत मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
