Sambhajinagar Crime : दुचाकी वेळेत परत न केल्याचा वाद विकोपाला; दोघांना दगडाने ठेचून मारले
शहरातील बायजीपुरा भागात शनिवारी मध्यरात्री दोन युवकांची निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. दुचाकी वेळेवर परत न केल्याच्या कारणावरून सलमान खान आरेफ खान (वय 30) आणि त्याचा मेहुणा सुलतान शेख (वय 17) यांना दगडाने ठेचून मारण्यात आले.
घटना मध्यरात्री 12.30 च्या सुमारास घडली. शेख आसिफ शेख हाफिज (रा. सिल्लोड) याचा सुलतानसोबत दुचाकीविषयी वाद झाला होता. फोनवर झालेल्या संवादात त्याने सुलतानबद्दल नाराजी व्यक्त करत त्याला सोडणार नसल्याची धमकी दिली होती, अशी माहिती मृत सलमानचा भाऊ इम्रान खान आरेफ खान यांनी दिली आहे. त्यामुळे त्यांनी शेख आसिफवर हत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे.
इम्रान खान यांच्या म्हणण्यानुसार, सकाळी 7 वाजता चंपा चौकात त्यांच्या चुलत भावाकडून त्यांना सलमान आणि सुलतानवर हल्ला झाल्याचे कळले. घटनास्थळी पोहोचताच सलमान मृत अवस्थेत आढळून आला, तर गंभीर जखमी सुलतानचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. दोघांच्याही चेहऱ्यावर आणि डोक्यावर दगडाने हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे. या अमानुष हत्याकांडामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस तपास सुरू असून संशयित आरोपी अद्याप फरार आहे.