"हातात मशाल घेऊन महाराष्ट्रात रणशिंग फुंका आणि हुकूमशाहीचा अंत करा", उद्धव ठाकरे कडाडले
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात इंडिया आघाडीनं महायुती सरकारविरोधात रणशिंग फुंकलं. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरु झालेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी जनतेला संबोधीत करताना उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली. भाजप एक फुगा आहे आणि या फुग्यात हवा आम्हीच भरली, राज्यात फक्त दोन खासदार होते आणि आता त्यांच्या डोक्यात हवा गेलीय. कुणीही राज्यकर्ता अमरपट्टा घेऊन येत नाही. हुकुमशाहीचा अंत होतो. देश हाच माझा धर्म आहे. अबकी बार भाजप तडीपार झाला पाहिजे. हातात मशाल घेऊन महाराष्ट्रात रणशिंग फुंकायचंय, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला धारेवर धरलं.
ठाकरे पुढे म्हणाले, राहुल गांधी भारत जोडो यात्रेची सांगता महाराष्ट्रात आणि मुंबईत करत आहे, त्यामुळे त्यांचं मी स्वागत करतो. महात्मा गांधी यांनी १९४२ साली इंग्रजांना 'चले जाव' सांगितलं,हीच ती मुंबई आहे. आता ४०० पार म्हणजे भाजप काय फर्निचरचं दुकान टाकतंय, काश्मीर आणि कन्याकुमारीपर्यंत ही परिस्थिती आहे. आम्ही हुकुमशाहीचे विरोधक आहेत, मोदी जेव्हा घराणेशाहीवर आरोप करतात, मग तुमच्या परिवारात तुम्ही आणि तुमची खुर्ची हाच तुमचा परिवार, असं म्हणत ठाकरेंनी मोदींवर टीका केली.
संविधान वाचवण्याची ही लढाई आहे. आनंदकुमार हेगडे बोललेत आम्हाला घटना बदलायची आहे, म्हणून ४०० पार करायचं आहे. देश हाच माझा धर्म, देश वाचला तर आम्ही वाचू. देशापेक्षा व्यक्ती मोठा झाला नाही पाहिजे. , मुंबईत जे बोललं जातं तेच देशात सुरु होतं. देशाची जनता आमच्या सोबत आहे. गावा गावात जाऊन हुकूमशाहीचा अंत करा, असं आवाहन ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.