2024 आधीच रेडे सरकार कोसळणार असल्याने फडणवीस थयथयाट करत आहेत; ‘सामना’तून हल्लाबोल
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोकणात भराडी देवीच्या यात्रेला उपस्थित होते. त्यांनी तिथे जाहीर सभाही घेतली. यावेळी सभेत बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोकणात नाणार प्रकल्प आणणारच असे त्यांनी म्हटले. यावर शिवसेनेचा अग्रलेख सामनातून टीका करण्यात आली आहे.
सामनातून म्हटले आहे की, नाणारचा प्रकल्प करून का, असा भराडी देवीचा कौल आहे. हा कौल टाळून काही कराल तर देवीचा कोप होईल. इतके जागरूक हे देवस्थान आहे, असं सांगतानाच अदानीच्या घोटाळ्यामुळे देशांचे, बँकांचे, एलआयसीचे अजितबात नुकसान झालेली नाही अशी थाप निर्मला सीतरामण यांनी मारली. तशीच थाप नाणारबाबत देवेंद्र फडणवीस मारत आहेत. अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
कोकणात रिफायनरी आणणारच असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं असलं तरी कोकणातील जत्रेत कुस्त्यांचे फड होत नाहीत. कोणी बाहरेच्या पहेलवानाने उगाच पिचक्या मांडीवर थाप ठोकली तरी कोकणची जनता त्यास धूप घालत नाही. फडणवीस हे कोणत्या गुंगीत आहेत? मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे फडणवीस भरकटले आहेत. 2024 आधीच रेडे सरकार कोसळणार असल्याने फडणवीस थयथयाट करत आहेत. असा हल्लाबोल सामनातून केला आहे.
यासोबतच फडणवीस कोकणात भराडी देवीच्या दर्शनासाठी आले होते की कोकणचे स्मशान करणाऱ्या रिफायनरीची वकिली करण्यासाठी आले होते? हे परप्रांतीय जमीनदार भाजपचे अर्थपुरवठादार म्हणजे छोटे अदानी आहेत, असा चिमटाही काढण्यात आला आहे. फडणवीस या छोटे अदानींची पाठराखण करण्याची भाषा बोलत आहेत. हे सरकार जमीनदारांची पाठराखण करत असून कोकणाच्या मुळावर उठले आहे,असे सामनातून म्हटले आहे.