आजचा चोर गट उद्या विधिमंडळात नसेल; ‘सामना’तून हल्लाबोल
राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजून निर्णय दिल्यानंतर राजकारण चांगलेच तापले. अनेक प्रतिक्रिया यावर येऊ लागल्या. याच पार्श्वभूमीवर सामनाच्या अग्रलेखातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.
सामनातून म्हटले आहे की, महाराष्ट्रातील तथाकथित सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मिंधे गटाचे वकील सांगत आहेत, ”आम्ही म्हणजेच शिवसेना!” या ‘आम्ही’वर न्या. चंद्रचूड यांनी घेतलेला आक्षेप महत्त्वाचा आहे. ”विधिमंडळात तुमच्याकडे बहुमत आहे याचा अर्थ तुम्ही म्हणजे पक्ष होत नाही.” न्या. चंद्रचूड यांनी नेमके विधान केले आहे. विधिमंडळातील फक्त चाळीस आमदार म्हणजेच शिवसेना, असा निर्णय निवडणूक आयोगातील ईस्ट इंडिया कंपनीच्या एजंटांनी दिला काय आणि या विकतच्या बहुमतवाल्यांनी नाचायलाच सुरुवात केली. अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
तसेच रस्त्यांवरील ‘कुंड्या’ आलिशान गाडीत चोरून न्याव्यात त्याप्रमाणे निवडणूक आयोगाबाहेर दिमाखदार गाड्या लावून त्यांनी धनुष्यबाण व शिवसेना चोरून नेली. भाजपचे राज्य असल्यानेच श्रीमंतांना रस्त्यांवरील कुंड्या चोरण्याची विकृती निर्माण झाली, पण हे रस्त्यावरील कुंडीचोर म्हणजे खरी शिवसेना नव्हे. असूच शकत नाही. घर म्हणजे चार भिंती नाहीत. शिवसेना म्हणजे विधिमंडळ नाही. असे म्हणत सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे.