गुजरातच्या न्यायहक्काचं गुजरातला द्या, पण माझ्या न्यायहक्काचं ओरबाडून नेलं, तर...; उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला इशारा
लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून सर्वच राजकीय पक्षांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. अशातच उद्धव ठाकरे भाजप सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागत आहेत. बुलढाण्याच्या सभेतही ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातले उद्योगधंदे मोदी गुजरातला नेत आहेत. गुजरातविरुद्ध संपूर्ण देश, असं चित्र मोदी तयार करत आहेत. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. कारण नसताना हे राज्या राज्यात आगी लावत आहेत. हे पंतप्रधानांचं चांगलं लक्षण नाहीय. गुजरातच्या न्यायहक्काचं गुजरातला द्या, पण माझ्या न्यायहक्काचं ओरबाडून नेलं तर याद राखा. मी मुख्यमंत्री असताना तुमची हिंमत होत नव्हती.
जनतेला संबोधीत करताना ठाकरे म्हणाले ,आज ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र लुटला जातोय, त्याची कुणालाच काही पडली नाहीय. ना मिंधेला पडले, ना अजित पवारांना. आमचे सगेसोयरेही त्यांच्या चरणी जाऊन लोटांगण घालत आहेत. मी असं काही करु शकत नाही. माझा गुजरातबद्दल द्वेष नाही. मोदी भेदभाव करत आहेत. शेतकऱ्यांना हमीभाव देत नाहीत. पीक विम्याचे पैसै देत नाहीत. काही दिवसांपूर्वी गारपीट झाली, किती जणांना मदत मिळाली, तुम्ही शेतीला भाव देत नाही, शेतकऱ्यांना शिक्षण देत नाही आणि म्हणतात चारशे पार..अजिबात नाही, अब की बार भाजप तडीपार.
ठाकरे पुढे म्हणाले, ५० खोक्यांचा नारा जसा घुमला, तसं गावागावात अबकी बार भाजप तडीपारचा नारा घुमला पाहिजे. कुणी दुसऱ्या धर्माचा आहे, म्हणून त्याला मारा, हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं नाही. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. शिवसेनेचं हिंदुत्व हृदयात राम आणि हाताला काम असं आहे. आमचं हिंदूत्व चूल पेटवणारं आहे आणि भाजपचं हिंदूत्व घर पेटवणारं आहे. स्वत:चं स्वराज्य स्थापन करणं हे आयुष्य आहे. परक्यांची चाकरी करणं हे आयुष्य नाही. नोटिशा आल्यानंतर काहीजण भाजपात पळाले. मी पुन्हा येईनवर. लाज वाटली पाहीजे तुम्हाला तुम्ही दोन पक्ष फोडायची वेळ आली तुमच्यावर. मोदी बोलतात, मै अकेला सब पे भारी, उद्धव ठाकरेंना संपवायला कचऱ्याची गाडी का फिरवायला लागतेय, सगळ्या कोपऱ्यात पडलेला कचरा तुम्हाला गोळा का करावा लागतोय., सगळा कचरा गोळा करतायत आणि उद्धव ठाकरेशी लढतात. उद्धव ठाकरेंना संपवण्यात यश मिळत असेल, तर लढूनच बघा, कारण गाठ या मर्द मावळ्यांशी आहे.
खताच्या पिशवीवर कोणाचा फोटो आहे, असं जनतेला विचारताच, उद्धव ठाकरे म्हणाले, फोटो मोदींचा आणि आतमध्ये शेणखत. कशावर फोटो छापायचा हेही कळत नाही. सुलभ शौचालया बाहेरही त्यांचा फोटो. या खताच्या पिशव्यांवर मोदींचा फोटो छापण्यात लाखो करोडो रपये वाया गेले. आता आचारसंहिता आहे. आता ह्यांचा फोटो लपवताही येत नाही आणि उघडही करता येत नाही, मग करायचं काय खताचं. एप्रिल मे महिन्यात खत लागेल, पण मोदी खत न्याययं कसं. स्वराज्य संपवण्यासाठी औरंगजेब आग्रा सोडून आपल्या राज्यात येऊन बसला, पण नाही संपवता आलं. लढत लढत औरंगजेब मेला पण अजूनही भगवा तसाच फडकतोय. फोडा, तोडा आणि राज्य करा, हेच तर भाजपवाले करत आहेत. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, अशोक चव्हाण घेतले.
मोदींच्या खताची विल्हेवाट लावण्याची ताकद या मर्द मावळ्यांमध्ये आहे. आपलं सरकार आल्यावर मोदींचा फोटो बदलून टाकायचा. एनडीएच्या सर्व नेत्यांनी मोदी हटावचा नारा लावला होता, पण फक्त बाळासाहेबांनी अडवाणींना सांगितलं होतं की, मोदींना हटवू नका. त्यावेळी जी शिवसेना तुमच्या मागे उभी राहिली, ती शिवसेना तुन्ही संपवायला निघालात. भाजपात या, नाहीतर तुरुंगात जा, ही अफ्जलखानीच वृत्ती आहे. तरुंगात काय टाकता, संजय राऊत तुरुंगाचे गज तोडून बाहेर आले. म्हणते तुरुंग फोडून बाहेर आले नाही. ते ईडीवालेचे म्हणाले यांना बाहेर काढा, नाहीतर आम्हालाच खाऊन टाकेल हा. माझं मुख्यमंत्री पद खेचलं म्हणून मी लढत नाही, असंही ठाकरे म्हणाले.