अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."
Uddhav Thackeray On Narendra Modi : पंतप्रधानपदासाठी दिल्या जाणाऱ्या सर्व सोयी-सुविधा तुम्ही वापरत आहात. तुमचा विमान आल्यावर एअर ट्रॅफिक बंद. तुमची कार आल्यावर रोड ट्रफिक बंद. तुमची सभा असल्यावर उद्योगधंदे, कार्यालय बंद. पण आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत. आम्ही ट्रॅफिकमधून जातोच. तेव्हा लोक आम्हाला सांगतात, उद्धवजी काही काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. मोदीजी याच्यावर तुम्ही जीएसटी लावू शकत नाही. हे माझे निवडणूक रोखे आहेत. हे तुमचे काळे पैसे नाहीत. हे माझे भगवे आहेत. यांना महाराष्ट्र बदनाम करून टाकायचं आहे. भाजपात या, नाहीतर तुरुंगात जा, यालाच आम्ही हुकूमशाही बोलतोय. मोदीजी एकनाथ खडसेंनी २०१४ ला मला फोन करून सांगितलं होतं, उद्धवजी वरुन आदेश आला आहे. आता आपली युती टीकत नाही. आम्ही युती तोडत आहोत. तुम्ही मला फोन करुन तेव्हा याबाबत विचारलं का नाही. संपूर्ण देश तुम्ही नासून टाकला आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली. ते रायगडचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्याप्रचारसभेत बोलत होते.
उद्धव ठाकरे मोदींवर टीका करत म्हणाले, मोदींनी ४०० पारचा नारा दिला आहे. पण लोकांनी अबकी बार भाजप तडीपारचा नारा दिला आहे. तुम्हाला राजकारणात पोरं होत नाहीत, हा आमचा गुन्हा आहे का? आमची पोरं तुम्ही पळवत आहात, माझे वडील पळवले. पोरांना, वडीलांना पळवताय मग तुमच्यात कर्तुत्व काय आहे. पूर्वीचा भाजप आणि संघाबद्दल आजही मला आदर आहे.
लोकं पिसाळलेली आहेत, लोकं चिडलेली आहेत. लोक वाट पाहता आहेत, ७,१३, २० तारीख कधी येते आणि ४ जून कधी येतोय. लोकं वाट बघताय, तरीख येते कधी आणि ठोकतोय कधी. त्या सभेत मी म्हणालो होतो. मोदींनी मला ऑपरेशनचा सल्ला दिला होता. ते माझी चौकशी करत होते. खऱ्या-खोट्यात मी जात नाही. पण जगात आणि देशात खोटं कोण बोलतोय, हे लोकांना कळलं आहे. फक्त माझ्याशी खोटं बोललेत असं नाही. तुम्हाला १५ लाखांचं वचन दिलं होतं. २ कोटी रोजगाराचं असेल, घराचं वचन दिलं असेल, आणखी काही वचनं दिली असतील, हे सर्व खोटं बोलण्याचं काम मोदी-शहा आणि भाजपने केलेलं आहे. मोदींची गॅरंटी मला नको आहे. माझी गॅरंटी माझ्यासमोर आहे.
मोदी साहेब माझी चौकशी आस्थेनं करत होते, मग मी रुग्णालयात असताना माझ्या गद्दारांशी रात्री-अपरात्री बोलणी कोण करत होतं, हे तुम्हाला माहित नव्हतं? माझं सरकार गद्दारी करून खाली खेचत आहेत. गद्दारांना तुम्ही असली शिवसेना म्हणून मिरवताय, हे तुमचं माझ्याबद्दलचं प्रेम आहे का? तुम्हाला हिंदूहृदयसम्राट हा शब्द उच्चारायला जड जातोय. बाळासाहेबांचं माझ्यावर खूप मोठं कर्ज आहे. ते कर्ज आता महाराष्ट्राची जनता व्याजासकट वसूल केल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र लुटणाऱ्यांसोबत शिवसेना प्रमुखांचा पुत्र जाऊ शकेल का, तुम्ही महाराष्ट्र ओरबाडत आहात. जातीपातीत धर्मात विष कालवत आहात. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. तरीही इथे अनेक मुस्लिम बांधव आलेले आहेत.
नसीम खान माझ्या बाजूला बसले आहेत. दलवाई साहेब माझ्यासोबत बसले आहेत. यांनाही माहितीय मी कोण आहे, पण तुम्ही हिंदुत्त्वाच्या नावाखाली संपूर्ण नंगा नाच करत आहेत. आम्ही घरातली चूल पेटवणारी माणसं आहोत. तुम्ही घर पेटवणारी माणसं आहोत. लोकांनी जर मला सांगितलं, मोदींमुळे आम्ही खूश आहोत, तर आम्ही मोदींचा जाहीर प्रचार करू. अमित शहा मला आव्हान देतात की, हिंम्मत असेल तर याच्यावर बोला आणि त्याच्यावर बोला. मी सर्व विषयांवर जनतेसमोर तुमच्याशी वादविवाद, चर्चा करायला तयार आहे.
तुम्ही जो विषय म्हणाल, त्या विषयावर मी बोलायला तयार आहे. तुमच्यात हिंम्मत असेल, तर जनतेच्या प्रश्नावर बोला. गाईवर बोलण्यापेक्षा महागाईवर बोला. तुम्ही गाय बोलता, पण आम्ही महागाईवर बोलतोय. हिंम्मत असेल तर तुम्ही महागाईवर बोला. बेरोजगारीवर तुम्ही बोला. इकडचे उद्योगधंदे तुम्ही ओरबाडून नेले आहेत. त्याच्यावर तुम्ही बोला. तुम्ही लावलेला ४०० पारचा नारा आता खाली आला आहे. संविधान बदलण्यासाठी आम्हाला ४०० पार करायचं आहे, असं तुमचेच लोक सांगत आहेत, असं म्हणत ठाकरेंनी मोदी सरकारचा समाचार घेतला.