Kangana Ranaut : मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांना झटका; कंगना राणौत म्हणाली...
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात प्रतिक्रिया-प्रतिक्रियांचा अक्षरशः पूर आला आहे. राजकीय नेत्यांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकजण आपली भूमिका उघडपणे मांडत आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिची एक जळजळीत आणि वादग्रस्त प्रतिक्रिया समोर आली असून, तिने थेट उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबई महापालिकेच्या निकालात ठाकरे गटाला मोठा झटका बसल्यानंतर कंगना राणौतने सोशल मीडियावरून प्रतिक्रिया देत “मला न्याय मिळाला आहे,” असे म्हटले आहे. कंगनाच्या मते, उद्धव ठाकरे सरकारच्या काळात तिच्या मुंबईतील घरावर जी कारवाई करण्यात आली, ती द्वेषपूर्ण आणि सूडबुद्धीने प्रेरित होती. त्या घटनेची आठवण काढत कंगनाने पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त केली.
“ज्या लोकांनी मला शिव्या घातल्या, मला धमक्या दिल्या, माझं घर पाडलं, माझ्याविरोधात अत्यंत वाईट भाषा वापरली आणि मला महाराष्ट्र सोडण्याची धमकी दिली – आज त्याच लोकांना महाराष्ट्राने सोडले आहे,” असे कंगनाने स्पष्ट शब्दांत म्हटले आहे. तिने पुढे सांगितले की, मुंबई हायकोर्टाने देखील त्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली होती आणि ती कारवाई द्वेषपूर्ण असल्याचा निर्वाळा दिला होता.
कंगनाने आपल्या प्रतिक्रियेत केवळ राजकीय नेतृत्वावरच नव्हे, तर संपूर्ण व्यवस्थेवर टीका केली आहे. “महिलांचा द्वेष करणारे, धमक्या देणारे आणि माफियागिरी करणारे लोक सत्तेत टिकू शकत नाहीत. जनता जनार्दनाने त्यांची योग्य जागा दाखवली आहे,” असे ती म्हणाली. या निकालामुळे सत्याचा आणि न्यायाचा विजय झाल्याची भावना तिने व्यक्त केली.
दरम्यान, कंगनाच्या या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी सोशल मीडियावर कंगनाच्या वक्तव्यावर तीव्र चर्चा सुरू आहे. मुंबई महापालिकेचा निकाल केवळ राजकीय समीकरणेच बदलणारा ठरत नाही, तर जुन्या वादांनाही पुन्हा उजाळा देणारा ठरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
