Kiran Rijiju : "राहुल गांधी आपली निराशा..."; केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची राहूल गांधीवर हल्लाबोल
थोडक्यात
हरियाणा विधानसभा निवडणुकीबाबत आरोप काँग्रेसचे खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले.
या आरोपांवर बुधवारी भाजपनं कडक प्रतिक्रिया दिली.
केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींच्या आरोपांचा फोलपट उडवला
Kiran Rijiju On Rahul gadhi : हरियाणा विधानसभा निवडणुकीत प्रचंड मतचोरी झाली आणि निवडणूक आयोगाने भाजपाला जिंकवून दिलं, असा आरोप काँग्रेसचे खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. या आरोपांवर बुधवारी भाजपनं कडक प्रतिक्रिया दिली. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींच्या आरोपांचा फोलपट उडवला आणि त्यांना “बिहार निवडणुकीपूर्वीचं राजकीय नाटक” असे म्हटले.
रिजिजू म्हणाले, “राहुल गांधी हे स्वतःच्या अपयशाचं आवरण तयार करत आहेत. उद्या बिहारमध्ये मतदान आहे, पण ते हरियाणाबद्दल कथा सांगत आहेत. याचा अर्थ काँग्रेसकडे बिहारमध्ये काहीच उरलं नाही आणि लक्ष विचलित करण्यासाठी ते हरियाणा मुद्दा रेटत आहेत.” विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींनी गंभीर विषयांवर बोलावं, असंही त्यांनी सांगितलं.
ब्राझिलियन मॉडेलचा फोटो मुद्दा – ‘राजकीय ड्रामा’
राहुल गांधी यांनी हरियाणाच्या मतदार याद्यांमध्ये एका ब्राझिलियन मॉडेलचा फोटो वेगवेगळ्या नावांनी वापरल्याचा आरोप केला होता. त्यावरही रिजिजूंनी टीका केली. “राहुल गांधी परदेशात माहिती गोळा करतात आणि ती भारतात आणून नाटक करतात,” असा टोलाही त्यांनी लगावला. २५ लाख बनावट मतांची निर्मिती झाली, हा दावा “राजकीय प्रेरित आणि खोटा” असल्याचे रिजिजू म्हणाले.
राहुल गांधींचे आरोप
राहुल गांधी यांनी दावा केला की हरियाणामध्ये २५,४१,१४४ बनावट मतदार आहेत आणि हे सरकारने मुद्दाम तयार केले आहेत. ‘ऑपरेशन सरकार चोरी’ राबवून काँग्रेसचा विजय पराभवात बदलला, असा गंभीर आरोप त्यांनी केला. मतदार याद्यांमध्ये डुप्लिकेट नावे, अवैध पत्ते आणि मोठ्या प्रमाणात एकाच पत्त्यावर नोंदणी झाल्याचेही त्यांनी उदाहरणांनी स्पष्ट केलं. “सर्व सर्वेक्षणांत काँग्रेसचा विजय दाखवला गेला होता. पोस्टल मतांमध्ये काँग्रेसला ७३ जागा तर भाजपाला फक्त १७ जागा मिळाल्या. पण निकाल वेगळाच लागला,” असा दावा राहुल गांधींनी केला.
तसेच हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक भाजप कार्यकर्त्यांनी दुहेरी मतदान केल्याचा आरोपही त्यांनी केला. सर्वोच्च निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी बेघर लोकांना ‘शून्य क्रमांकाचा’ पत्ता देण्याचं स्पष्टीकरण दिलं होतं; मात्र तेही खोटं असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.c

