"त्यांनी आघाडीत बिघाडी केली आणि...", प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं
वंचितच्या पाठीत संजय राऊत यांनी खंजीर खुपसला, असं खळबजनक ट्वीट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नुकतच केलं होतं. त्यानंतर राजकीय वातावरण तापलं होतं. अशातच प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले, आमच्याकडे तीन जागांचा प्रस्ताव आला होता, त्यानंतर कोणताही प्रस्ताव आला नाही. त्यांनी आघाडीत बिघाड केलाय, हे आम्हाला दाखवायचे होते. ज्या पद्धतीने विरोधी पक्ष उभा राहीला पाहिजे, तसं होताना दिसत नाहीय. तो उभा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो.
आंबेडकर पुढे म्हणाले, राज्यात ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत, त्यांच्याशी चर्चा करून भाजपविरोधात महत्त्वाची आघाडी उभी राहील. आमच्या संघटनांचा अजेंडाही हळू हळू तयार होत आहे. महाराष्ट्रात एकंदरीत १४ लाख सरकारी कर्मचारी आहेत आणि अधिकारी आहेत. या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ केली पाहिजे, येत्या ५ वर्षांच्या कालावधीत ती संख्या २२ लाखांपर्यंत नेली पाहिजे. तरच शासन व्यवस्थित काम करेल. आम्ही २२ लाखापर्यंत नेले, तरी सगळ्यांनाच रोजगार देऊ शकतो, असं नाही. पण मूलभूत बदल करण्याबाबत आम्ही चर्चा केली आहे.
जरांगे पाटील यांची भेट झाली होती. लोकसभेबाबत चर्चा झाली. त्यांनी नवीन सिस्टम सुरु केले, त्याबाबत माहिती दिली. त्यांची पुढची वाटचाल काय असणार, यावर चर्चा झाली. भाजपच्या विरोधात मजबूत आघाडी करायची, असा आमचा प्रयत्न होता. पण दुर्दैवाने आम्हाला अपेक्षित आघाडीत मिळाली नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.