"राज्यात टेंडरबाज आणि टक्केवारीचं सरकार असल्यामुळं शेतकरी आत्महत्या करतात"; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Vijay Wadettiwar Press Conference : शेतकऱ्यांकडे बघायला नालायक लोकांकडे वेळ नाही. हे टेंडर आणि टक्केवारीत व्यस्त असलेलं सरकार आहे. एव्हढा मोठा दुष्काळ पडला असताना, त्यांनी निवडणुकीचं आचारसंहितेचं कारण सांगितलं. दुष्काळग्रस्तांना शेतकऱ्यांना मुर्ख बनवण्याचं काम केलं. दुसरीकडे मात्र निवडणूक आयोगाकडे विशेष परवानगी मागून २५ हजार कोटीचे टेंडर काढले. शेतकरी आणि सामान्य जनता दुष्काळात होरपळत असताना आचारसंहितेचं कारण सांगायचं, इतका बेशरमपणा या सत्ताधाऱ्यांमध्ये आहे. हे सरकार टेंडरबाज सरकार आहे, हे आता स्पष्ट झालं आहे. यांना शेतकऱ्यांशी काहीही घेणं देणं नाही, असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.
पत्रकार परिषदेत वडेट्टीवार म्हणाले, या चार महिन्यात अनेक भागात गारा पडल्या. अवकाळी पावसामुळे नुकसान झालं. विशेष करुन सोयाबीन उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला. २०१३ मध्ये साडेचार हजार रुपये दर होता. पण दहा वर्षानंतरही शेतकऱ्याला चार हजाराच्या दराने सोयाबीन विकावं लागलं, हे मोठं दुर्देवं आहे. ज्या पंतप्रधानांनी शेतकऱ्याला सांगितलं, तुमच्या शेतमालाला दुप्पट भाव देऊ. एमसएसपी देऊ, हमीभाव देऊ. पण शेतकऱ्याला हमीभाव मिळाला नाही. कापूस आणि सोयाबीन हे दोन्ही शेतकरी सरकारच्या नाकर्तेपणामुळे अडचणीत आहे.
गेल्या तीन महिन्यात २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा रिपोर्ट आहे. मराठवाड्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. हे राज्याचं दुर्दैवं आहे आणि शासनाचं अपयश आहे, असं मला वाटतं. अनेक भागात पिण्याचं पाणी मिळत नाहीय. विदर्भातील अनेक भागातली दुष्काळाची स्थिती आहे. काल एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. या शेतकऱ्याने शेती गहान ठेऊन कर्ज काढलं. बँकेकडे कर्जाची मागणी केली. पण कर्ज देण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांनी लाज मागितली. लाच न दिल्यानं या शेतकऱ्याला कर्ज मिळालं नाही. त्यामुळे या शेतकऱ्याला त्याची जीवनयात्रा संपवावी लागली. ही अत्यंत दु:खद आणि दुर्देवी घटना महाराष्ट्रात घडली, असंही वडेट्टीवार म्हणाले.