Vijay Wadettiwar : एसटी दरवाढीचा निर्णय मंत्री घेत नाही तर या परिवहन खात्याला वाली कोण ?
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळकडून 15 टक्क्यांची भाडेवाढ करण्यात आलेली आहे. एसटी महामंडळाकडून 15 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला देण्यात आला होता.
याच पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकार म्हणून त्यांनी दरवाढ केली नसेल तर दरवाढ करतंय कोण? कारण तिथे महामंडळ अध्यक्ष नाहीत, जर अध्यक्ष असेल तर सरकारच्या परवानगीशिवाय ते करता येत नाही. म्हणून आमची स्पष्ट भूमिका आहे. आता ते मंत्र्यांनी नाही म्हटले आहे, उपमुख्यमंत्र्यांनी नाही म्हटले आहे. त्यामुळे आता ही दरवाढ त्वरित मागे घेण्याचा आदेश काढावा. सर्वांना दिलासा द्यावा.
नेमका या खात्याचा वाली कोण? हे खातं कोण चालवतं? उपमुख्यमंत्र्यांना माहित नाही, मंत्र्यांना माहित नाही. भाडेवाढ केली कोणी? मला वाटतं सगळी खाती अधिकारी चालवतात आणि मंत्री घरी बसून आदेश करतात. असा त्याचा अर्थ होतो काय?
यासोबतच ते पुढे म्हणाले की, सरकारमध्ये चाललेला हा सगळा पोरखेळ आहे. कुठल्याही प्रकारचे गांभीर्य नाही. जर हा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असेल मग त्या अधिकाऱ्यावर कोण कारवाई करेल? मग मंत्री करणार का त्यांच्यावर कारवाई. अंगलट आले की मी नाही म्हणायचे आणि चांगलं झालं की श्रेय घ्यायचं. असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.