Municipal Elections : उद्या १५ जानेवारीला २९ महापालिकांसाठी मतदान; मुंबईसह इतर महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज

Municipal Elections : उद्या १५ जानेवारीला २९ महापालिकांसाठी मतदान; मुंबईसह इतर महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज

१५ जानेवारी रोजी मतदान होणार असून मुंबई महापालिकेसह इतर सर्व महापालिकांची संपूर्ण प्रशासकीय आणि निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवार, १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून मुंबई महापालिकेसह इतर सर्व महापालिकांची संपूर्ण प्रशासकीय आणि निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी विशेष खबरदारी घेण्यात आली असून, प्रत्येक प्रभागात किमान एक ‘गुलाबी सखी’ मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. या मतदान केंद्रांचे वैशिष्ट्य म्हणजे येथे संपूर्ण व्यवस्थापन महिलांकडून करण्यात येणार आहे. पोलीस अधिकारी, सुरक्षा कर्मचारी, निवडणूक कर्मचारी आणि मतदान अधिकारी सर्व महिला असतील. महिला मतदारांना सुरक्षित, सुलभ आणि विश्वासार्ह वातावरण मिळावे, या उद्देशाने ही संकल्पना राबवण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांनी मतदान केंद्रावर मोबाईल फोन नेऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अत्यावश्यक कारणास्तव मोबाईल नेल्यास तो पूर्णपणे स्विच ऑफ ठेवणे बंधनकारक असेल. मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा किंवा गैरप्रकार होऊ नये, यासाठी हे नियम काटेकोरपणे राबवले जाणार आहेत.

निवडणूक आचारसंहिता प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी प्रत्येक प्रशासकीय विभागात विभागीय सहायक आयुक्तांच्या अधिपत्याखाली विशेष पथके कार्यरत आहेत. यामध्ये स्थिर पाळत पथक निश्चित ठिकाणी तैनात करण्यात आले असून, रोख रक्कम, दारू, अमली पदार्थ तसेच शस्त्रसाठ्याची बेकायदेशीर वाहतूक यावर कडक नजर ठेवली जात आहे. यासोबतच भरारी पथक संपूर्ण प्रभागात फिरून तपासणी करणार असून, आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे.

मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन सर्वेक्षण आणि नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जाणार आहे.न प्रशासनाने नागरिकांना निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले असून, कोणत्याही प्रकारच्या दबावाला किंवा आमिषांना बळी न पडता लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com