Rain Alert : कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा! पुढील काही दिवस...; हवामान खात्यातून महत्त्वाची माहिती समोर

Rain Alert : कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा! पुढील काही दिवस...; हवामान खात्यातून महत्त्वाची माहिती समोर

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून कोकणासह घाटमाथ्यावरील भागात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाकडून पुढील पाच दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावरील भागात विशेषतः मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता असून त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबई शहर, उपनगर आणि रायगड जिल्ह्यात पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर ठाणे, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. रायगड जिल्ह्यातील अंबा आणि कुंडलिका तसेच रत्नागिरीतील जगबुडी आणि कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

त्यामुळे या जिल्ह्यांतील नागरिकांना प्रशासनाने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे चिपळूण-गुहागर मार्गावरील रामपूर घाटात मोठी दरड कोसळून वाहतूक जवळपास दोन तास ठप्प झाली होती. नंतर दरड हटवून मार्ग पुन्हा सुरू करण्यात आला. राज्यात मुसळधार पावसामुळे घर कोसळून चार जणांचा मृत्यू झाला असून विजेचा कडकडाट होऊन एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

हवामान विभागाने 16 ऑगस्ट रोजी मुंबई शहर, उपनगर आणि रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट आहे, तर पालघर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 17 ऑगस्ट रोजी मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि घाटमाथ्यावरील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असणार आहे. इतर भागांत यलो अलर्ट देण्यात आला आहे.

18 ऑगस्ट रोजी पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट तसेच मराठवाड्यातील बीड आणि लातूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई शहर, उपनगर, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा येथे यलो अलर्ट दिला आहे. 19 ऑगस्ट रोजी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट असेल. तर मुंबई, उपनगर, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिला गेला आहे.

पावसाचा वाढलेला जोर आणि त्यातून निर्माण होणारी पूरस्थिती पाहता प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोकण व घाटमाथ्यावरील जिल्ह्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, धोकादायक भागांतील नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत होत आहे, तर नद्या-नाल्यांना पूर आल्यामुळे खालच्या भागांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज पाहता नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com