पुणे-नाशिक महामार्गावर पाणीच पाणी; दरडही कोसळल्या
आदेश वाकळे | संगमनेर : संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गावर चंदनापुरी घाटाजवळ महामार्ग प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे महामार्ग पूर्णतः पाण्याखाली गेला. यामुळे प्रवाशांना आणि वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.
संगमनेर तालुक्यातील पठार भागात मंगळवारी दुपारी आणि आणि रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला या पावसामुळे साईड गटारांची स्वच्छता न केल्याने हे पावसाचे पाणी जाण्यासाठी कोणताच पर्याय नसल्याने अखेर पावसाच्या पाण्याने महामार्ग पूर्णतः व्यापून टाकला आहे. यामुळे महामार्गाला एखाद्या तलावाचे स्वरूप प्राप्त झालं होतं, अनेक वाहनधारकांना बराच वेळ महामार्गावरच थांबून राहावं लागलं.
पावसाळ्यापूर्वी महामार्गालगत असणाऱ्या साईड पट्ट्यांची कामाची दुरुस्ती करणे क्रमप्राप्त असताना देखील केवळ महामार्ग प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे चंदनापुरी घाट आणि इतर ठिकाणी रस्त्यावरूनच पाणी वाहत असल्याने वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे, यामुळे अनेक छोटे मोठे अपघात होण्याची ही दाट शक्यता आहे, त्यातच कालच्या पावसानं चंदनापुरी घाटातील दरडींना तारेची जाळी मारली आहे, त्यातील भला मोठा एक दगड जाळी तोडून खाली आल्याने ही जाळी पूर्णतः तुटून गेली आहे, याची सुद्धा आता दुरुस्ती करणे गरजेचे आहे.भविष्यात आणखीन पाऊस झाला तर दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.